शनिवार, १४ एप्रिल, २०१८

भाषा

दोन वेगवेगळे देश, त्यांच्या वेगळ्या भाषा आणि दोन अगदी टोकाचे अनुभव!

मी इथे आल्यापासुन पाहतेय सगळीकडे जर्मन भाषेशिवाय पर्याय नाहीये फारसा. थोड्याफार प्रमाणात जर्मन समजणे आणि बोलणे इथे अनिवार्य आहे नाहीतर आपल्याला प्रचंड त्रास होतो. बऱ्याच लोकांना इंग्रजी कळत नाही; आणि कळत असेल तर ते तसं दाखवत नाहीत. आपल्याशी जर्मन मधेच बोलतात. दुकानदार, डॉक्टर, तिकीट चेकर, शिक्षक, अशा ज्या ज्या लोकांशी बोलावे लागते त्यांच्यापैकी फक्त १-२% लोकांना इंग्रजी समजते पण त्यांना बोलता येत नाही. माझ्या लेकाच्या शाळेच्या मुख्याध्यापक बाईंना इंग्रजी फारशी समजत नाही.

ह्यांचे धोरण सरळ आहे. तुम्ही आमची भाषा शिका; आम्ही तुम्हाला नोकरी देतो, तुमच्या मुलांना फुकट शिक्षण देतो. आमची भाषा शिकायची नसेल तर तुमचं आमच्या देशात अवघड आहे. खरोखर हे असंच आहे; आम्ही ह्या गोष्टीचा अनुभव घेतो आहोत. मुलाच्या शाळेविषयी विचार करत असताना ह्या गोष्टीची प्रखरतेने जाणीव झाली. इथल्या शासकीय शाळांमध्ये पूर्णपणे विनामूल्य शिक्षण आहे आणि इथल्या इंग्रजी माध्यमाच्या आंतराष्ट्रीय शाळेच्या (International School) एका वर्षाच्या शुल्कामध्ये(fees) कदाचित भारतात एक घर घेऊ शकतो आपण. त्यामुळे आंतरराष्ट्रिय शाळेचा विचार जास्त्त कोणी करत नाही. जर मुलाना दुसरी शाळा सोडून शासकीय शाळेत जायचे असेल तर त्यांच्यासाठी चवथीमध्येच पूर्वपरीक्षा घेतात. ही परीक्षा बऱ्यापैकी अवघड असते. जर्मन भाषा त्यांच्या अपक्षेप्रमाणे आलीच पाहजे नाहीतर ह्या परीक्षेत उत्तीर्ण होणे तसे कठीणच आहे. तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्णपणे जर्मन भाषेत आहे. किंवा इथलं सगळं शिक्षणच मातृभाषेत आहे असं म्हणणं योग्य ठरेल. ठिकठिकाणी मोठमोठी वाचनालयं आहेत जिथे १८ वर्षांपर्यन्तच्या मुलांना विनामूल्य सुविधा आहेत. तिथे प्रत्येक विषयावरची सगळी पुस्तके उपलब्ध आहेत. मला १ टक्का सुद्धा इंग्रजी पुस्तके दिसली नाहीत तिथे.

एकंदर काय तर इथे दुसऱ्या कोणत्याही भाषेला फारसा वाव नाही आणि जर्मन भाषा शिकायची नसेल तर तुम्ही तुमच्या देशात परत जाणे हाच एक पर्याय आहे. हा झाला माझा अनुभव.

ह्याच्या अगदी विरुद्ध अनुभव माझ्या मैत्रिणीचा. आपल्या देशातला, महाराष्ट्रातला, पुण्यातला.

माझ्या एका मैत्रिणीने शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एका प्रतिथयश शाळेत एका जागेसाठी अर्ज केला. १०-१२ वर्षांचा तगडा अनुभव, मराठी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व आणि अत्यंत हुशार असलेल्या तिला अर्ज केल्यावर २ दिवसात काहीही उत्तर आले नाही त्यामुळे तिला जरा आश्चर्यच वाटले तरी तिने विचार केला आपण अजुन १-२ दिवस वाट पाहु. तरीही कोणतेही उत्तर न आल्याने तिने त्या शाळेतील ओळखीच्यांना फोन करुन परिस्थिती सांगितली आणि जरा चौकशी करतात का म्हणून विचारले. त्या गृहस्थांनी लगेच माहिती काढली की "या व्यक्तीचा Resume मिळाला का? असेल तर त्यांना मुलाखतीसाठी का नाही बोलावले? वगैरे वगैरे". तर शाळेकडून जी माहिती मिळाली ते ऐकून तर मैत्रिणीला धक्काच बसला. धक्का बसण्यासारखीच गोष्ट घडली होती. शाळा सांगत होती की "त्यांचा Resume फार छान आहे, पण त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातुन झालेले असल्यामुळे आम्ही त्यांचा Resume रिजेक्ट केला." ही माहिती शाळेच्या व्यक्तीने मराठीतच सांगितली बरंका! तिथे असलेले बरेचसे लोक मराठीतच बोलत होते.

आपण आपल्याच देशात, आपल्याच राज्यात आपल्याच मातृभाषेत शिक्षण घेतलं असेल तर आपल्याला लोक चक्क नोकरीसाठी नाकारतात. हे मराठीसाठी कोणतं धोरण आहे आपल्याकडे खरंच? इंग्रजीवर प्रभुत्व असुन सुद्धा फक्त मराठी माध्यमातून शिक्षण घेतले म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नोकरी का मिळु नये?



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                                #rajashrismunichdiaries 

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

स्वप्नातली "ती"

नविन वर्ष सुरु होताना इतकं छान वाटतंय म्हणून सांगु! उद्या "ती" येणार आहे. किती दिवस झाले खरंच. खरंतर २-४ वर्षच झाले आहेत पण असं वाटतंय की युगे लोटलीत भेट होऊन. कसं आणि काय करावं; काही म्हणून सुचत नाहीये. पाडवा आहे म्हणुन पुरण तर घालणार आहेच मी पण अजून काय विशेष करावं बरं? तसं आधी गुलाबजामूनच करायचा बेत होता. पण "ती" येणार आहे असं कळाल्यावर बिनधास्त पुरणाचा घाट घालणार आहे मी.

इथे आल्यापासून नुसती वाटच पाहणे चालू आहे "तिची". "ती" कधी इथे येईल असं वाटलंच नव्हतं; पण अगदी उद्या येतीये म्हणजे दुधात साखरच जणु! माझ्या आनंदाला तर पारावारच नाही उरला. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि "ती" येतेय असं झालंय. वेळ अगदी मुंगीच्या पावलाने पुढे सरकतोय असं वाटतं आहे. मनाला एक प्रकारची शांती मिळतेय "ती" येणार म्हटलं की. नाचावसं वाटतंय, पंख लावून उडावसं वाटतंय. अहाहा "ती" येतीये!

इतकं भारी वाटत आहे ना! मैत्रिणीला भारतात फोन करून ही आनंदाची बातमी सांगिलीच मी. तिला वाटलं मला हर्षवायुच झालाय. पण शेवटी तिलाही माझ्या भावना कळल्याच कारण तीही कधी ना कधी तरी अशा परिस्थितीतून गेलीये ना. आम्ही खूप गप्पा मारल्या मग तिच्याविषयी. हा तर नेहमीचा जिव्हाळ्याचा विषयच आहे म्हणा!

माझा एकंदर नुर पाहुन नवऱ्याला काळजी वाटतेय. पण त्याला काय कळणार; मला किती निवांत वाटतं आहे ते. तो सारखा म्हणतोय "तु बरी आहेस ना गं?"  मी सांगितलं त्याला "अरे "ती" येतीये ना त्यामुळे मला कीनई फार भारी वाटतंय रे." तर म्हणे " माझी पण इतकी वाट पाहत नाहीस कधी!" आता त्याला काय सांगणार फरक. असो. माझ्या मनात उकळ्या फुटत आहेत हे कसं समजवणार त्याला. कोणी काहीही म्हणो पण ती आली की फेसबुकवर पोस्टच टाकणार आहे मी "फिलिंग व्हेरी हॅप्पी किंवा फिलिंग रिलॅक्सड किंवा फिलिंग फेस्टिव्ह विथ ती. "

एकदाचा पाडव्याचा दिवस उजाडला. सगळं पटकन आवरून, पुरणावरणाचा स्वयंपाक करुन, मस्तपैकी जेवण उरकुन मी आपली तिची वाट पाहत बसले आणि कधी डुलकी लागली ते कळलंच नाही. आनंदाच्या भरात झोपेतही अचानक कुठून तरी मंद संगीताचे सूर ऐकू यायला लागले. पण हळुहळू आवाज खूपच वाढायला लागला, मला वाटलं दारावरची बेल वाजली. तीच आली असेल. धडपडत उठले, वाटलं पटकन दार उघडु आणि पाहते तर.....

आजूबाजूला सगळी शांतता होती आणि माझ्या फोनमधला अलार्म वाजत होता.
.
.
.
.

हाय रे कर्मा! म्हणजे ती स्वप्नात सुद्धा माझ्या इथल्या घरी आलीच नाही? म्हणजे सगळे पुरणाच्या स्वयंपाकाचे भांडे मलाच घासावे लागणार??



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                    

बुधवार, १४ मार्च, २०१८

अजबच आहे खरं!

काहीकाही लोकांचं खरंच फार आश्चर्य वाटतं कधीकधी! अजब प्रकार असतात एकंदर.

आता माझी शेजारीण मॅगी काकुचेच बघा ना; त्या कुठून बाहेरून येत असतील आणि मी बाहेर निघाले असेल आणि आमची जिन्यात अथवा लिफ्ट मध्ये भेट झाली तर इतकं हसून आणि प्रेमानी बोलतील की बास. जसं  काही जन्मल्यापासुन मी ह्यांच्याच शेजारी राहतेय! त्याच मॅगी काकु त्यांच्या घरातुन बाहेत पडायच्या तयारीत असतील आणि मी माझ्या घरातून बाहेर पडुन त्यांच्या घरात डोकावत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर चक्क तोंडावर दार लावतात. तू कोण अन मी कोण? असं कुठं असतय होय? इथे आपण आपल्या घराबाहेर शेजारी उभे असतील तर पटकन घरात बोलवतो. एक दिवस बळजबरी त्यांच्या घरात घुसावच  म्हणतेय. कळेल तरी काय खजिना दडवून ठेवलाय ते. 

मी रोज ज्या वेळेला स्टेशनला जाते त्याच वेळेला तिथे तिकीट मशीनच्या आसपास एक इसम फिरत असतो. चांगला तरणाताठा आहे. पण तरीही लोकांना तिकिटासाठी पैसे मागत फिरत असतो. बरेच लोक पैसे देतात; त्या लोकांना ओरडून सांगावंसं वाटतं "अहो नका देऊ पैसे, बिअर पितंय ते येडं तुमच्या पैशात". कारण मी लेकाला घेऊन येताना पाहते तर स्टेशनवरच्याच दुकानात बिअर घेत असतो. त्याच स्टेशनवर एक आजोबा हातात पुस्तक उंचावून सलग उभे असतात कारण त्याचं पुस्तक विकलं जावं म्हणून. मी जातानाही ते उभेच असतात आणि येतानाही. किती हा विरोधाभास.

दुसऱ्या एका स्टेशनवर एक आज्जी, आज्जीच बरंका; एकदम सुकड्या, हवा आली तरी पडतील अश्या आणि अविर्भाव एखाद्या बॉडीबिल्डरचा. एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बिअरची बाटली घेऊन अक्षरशः झुलत असतात रोज. एवढ्या झुलतात तर गपगुमान लिफ्टने यावं ना स्टेशनवर; पण नाही त्या पायऱ्यांनींच येतात. दोन पायऱ्या चढतात एक उतरतात पुन्हा दोन चढतात एक उतरतात; वाटतं पडतेय आता ही बाई दाणकन पण नाही त्या असं करत वर पोहोचतात. बरं कोणी मदत करायला गेलं तर त्या माणसाला शिव्यांची लाखोली अगदी ठरलेली. मी खाल्या आहेत एकदा शिव्या. जर्मन भाषेतील बऱ्याच शिव्या कळायला त्यांच्यामुळे फार मदत झाली मला. सिगरेट पितच ट्रेनमध्ये चढतात आणि मग इतर प्रवाश्यांवर आरडाओरड करतात. मग ट्रेनचालक येऊन त्यांना समज देतो तेव्हा कुठे सिगरेट बाहेर फेकतात आणि मग एकदाची ट्रेन निघते.

जवळच्या सुपरमार्केटमध्ये एक आजोबा अधूनमधून दिसतात. "ह्या ह्या ह्या ह्या" हसत असतात; तेही जोरजोरात. बिलींच्या रांगेत त्यांच्या पुढे मागे असणाऱ्या लोकांचे सामान स्वतःचं म्हणून घेऊन टाकतात आणि पुन्हा " ह्या ह्या ह्या ह्या". आपण पुन्हा लेकाला पिटाळायचं सामान आणायला. आज आम्हाला विचारलं "तुम्ही इंडियन आहेत का? फारच छान देश आहे. मी इंग्लडला असताना गेलो होतो." पुन्हा " ह्या ह्या ह्या ह्या". भारताला गरीब न म्हणता चांगला म्हणणारा परदेशी माणुस; हा तर चमत्कारच म्हणायचा! मग लक्षात आलं की आजोबांच्या डोक्यावर  परिणाम झालाय.

मुलाला मस्त सरप्राईज देऊ वगैरे विचार डोक्यात ठेवुन, आई खूप दिवसांनी उत्साहाने शाळेत जाते त्याला घायला. आईला पाहुन "काय यार आई; तु कशाला आलीस मला घ्यायला? मी येतोय ना माझा माझा" असं म्हणणारा लेक! फार म्हणजे फारच गंमत वाटते बुआ.


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                         

गुरुवार, ८ मार्च, २०१८

महिलादिन वगैरे

आज घराबाहेर पडले आणि गेटच्या बाहेर गेले तर समोर एक इतकी गोंडस मुलगी प्रॅममध्ये होती जसं काही बाहुलीच आणि तिची आई पण एकदम गोड हसली माझ्याकडे पाहुन. त्या सुरेख बाहुलीला बाय करून सुपरमार्केटमध्ये गेले तर बिलिंग काउंटरला त्याच पिअर्सड काकु; मस्त स्माईल दिली त्यांनी निघताना.

कपड्यांच्या दुकानात गेले तर तिथल्या काकु एकदम टापटीप आणि वेल ड्रेस्ड. पुढे एका बेकरीत गेले तर तिथल्या दोघी जणी हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाला जे जे पाहिजे ते पटापट देत होत्या. अंडरग्राउंड ट्रेनमध्ये बसले आणि पुढच्या स्टेशनची अनाउन्समेंट ऐकली तर एका काकूंचा आवाज आला; अरेवा म्हणजे ट्रेन काकू चालवत होत्या.

काय मस्त योगायोग होतो ना कधीकधी! सगळीकडच्या ह्या स्त्रिया आणि त्यांचा आत्मविश्वास बघुन मलाही एक वेगळाच आत्मविश्वास आला. त्यात पुन्हा चिरंजीवांनी भेटल्याभेटल्या "अग आई तुला Happy Women's Day! मला शाळेत कळालं आज Women's Day आहे."  घरी आलो आणि फ्रिजमध्ये ठेवलेलं चॉकलेट दिलं मला; भेट म्हणुन. मी काहीच न सांगता स्वतःचं सगळं नीट आवरलं आणि मला प्रश्न विचारला..

.
.
.
.

"आई आज रात्री जेवायला काय करणार आहेस?"


#जागतिक_महिला_दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जरा उशीरच झालाय.. पण तरीही.



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                       

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

पुनश्च मोबाइलपुराण

आज दुपारी स्टेशनवर आले तेव्हा अचानक आजूबाजूला जरा गोंधळ सुरु झाला. लोक ट्रेन ट्रॅककडे बघुन काहीतरी बोलत होते. मला काहीच कळेना. मी आपलं वाकुन बघायचा प्रयत्न केला पण काय झालंय ते कळायला काही मार्गच नव्हता. उगाच मनात विचार आला, काही काम वगैरे तर नाही चालु ना? नाही कारण आपल्याकडे असं काही काम चालू असलं कि बघणारे दहा टाळके असतात ना.

आधी वाटलं कोणाचं कुत्रं तर पडलं नाहीये ना ट्रॅकवर? नाही काही सांगता येत नाही.. इथल्या लोकांसोबत लहान मुले क्वचित दिसतात पण कुत्रे हमखास असतात. पण मग लक्षात आलं की आजकाल जीवापाड जपलेली एक फार महत्वाची गोष्ट ट्रॅकवर पडली होती आणि त्या दादाचा जीव पार टांगणीला लागला होता. हि गोष्ट हातात नसेल तर माणूस सैरभैर होतो बिचारा, मग जर हि गोष्ट ट्रॅकवर पडली म्हटल्यावर त्या दादाची काय अवस्था झाली असेल खरंच.

हो हो.. बरोबर.. आलं तुमच्या लक्षात.. त्याचा मोबाईल.. नाही नाही.. त्याच्या गर्लफ्रेंडचा मोबाईल पडला होता ट्रॅकवर. तेच म्हंटल बिचाऱ्याला एवढं टेन्शन का आलं ते.

मुझे लगा अभी वो मर्द का बच्चा कुदके अपने जानेमनका मोबाईल लाके देगा.. पण कसचं काय. त्या दादाने दुसऱ्या बाजूच्या ट्रेन चालकाला विचारलं कि आता काय करावं. कारण जिकडे मोबाइल पडला होता तिथली ट्रेन यायला फक्त ९ मिनिट बाकी होते. आता तो दादा आणि त्याची GF ह्यांच्याबरोबर मलाही प्रचंड टेन्शन आलं. कसं होईल काय होईल? कोणत्या ब्रँडचा असेल बरं मोबाईल? मिळेल ना त्याला की जातोय ट्रेनखाली? हळूहळू घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. एकीकडे वाटलं च्या$%% आपणच उडी मारून पटकन देऊ त्याला काढुन, ६ मिनिट आहेत की ट्रेन यायला. पण नाही.. रुलबुकप्रमाणे प्रोसेस फॉलो झालीच पाहिजे. जर्मनीत राहतेय ना मी. उडी मारली तर मोबाईल राहिला दूर, मलाच ट्रॅकवरून उचलायला पोलीस येतील.

आता माझी पण घालमेल वाढत होती. आता फिल्मी विचार यायला लागले. "क्या ईस स्टेशनपर ऐसा कोई माईका लाल नही है जो कुदके मोबाईल ना निकाल सके?" "अबे तुझ्या GF चा आहे ना मोबाईल मग मार की उडी लेका वाट कशाची बघतोस?" ह्या सगळ्या असंख्य विचारांमध्ये मला नक्की कुठल्या ट्रेनमध्ये जायचं आहे हेच लक्षात येईना. त्याची GF फुल्ल टेन्शनमध्ये असुन सुद्धा शांत उभी होती. मी असते तर जीव खाल्ला असता नवऱ्याचा. ते असोच.

त्या ट्रेन चालकाने नक्की काय करावं लागेल ते सांगितलं बहुतेक त्या दादाला. मग त्याने स्टेशनवरील SOS(Emergency call) कॉल केला आणि मिनिटभरात पोलीस वॅनचा आवाज यायला लागला. आयला.. आपली मॅगी पण २ मिनिटात बनत नाही.. पण ह्यांचे पोलीस कॉल केल्यावर मिनिटभरात आले पण. लगेच त्यांनी नक्की काय झालंय ते विचारलं. त्या दादाने सांगितलं कि मोबाईल पडलाय. त्यांनी पटकन कम्प्लेंट रजिस्टर केली. आता ट्रेन यायला फक्त ३ मिनिट उरले होते. माझाच जीव खालीवर होत होता. पण त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या चिमटासदृश्य वस्तूने मोबाईल वर काढला आणि त्या सैरभैर दादाला दिला. दादाच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता, बहुतेक उष्ट्या सफरचंद ब्रॅण्डचा असावा मोबाईल. जसं काही त्या दादाने उडी मारूनच मोबाईल काढून दिलाय, असा आनंद त्याच्या GF च्या चेहऱ्यावर होता आणि बाकी माझ्यासारख्या लोकांनी हुश्श केलं. आणि हे सगळं मोबाइलपुराण घडलं अवघ्या १० मिनिटात.

शेवटी मी माझा मोबाईल घट्ट पकडून मला कोणत्या ट्रेनमध्ये जायचं आहे ह्याचा विचार करायला लागले.

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

अनपेक्षित

   परवा बाहेरून घरी येत होते, स्टेशनमधुन वर आले आणि घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अगदी वाहता रस्ता आहे. पण २-३ वर्षात एकदाही पोलीस कार आणि ऍम्ब्युलन्स शिवाय एकाही गाडीच्या हॉर्नचा आवाज नाही ऐकला कधी! वेगवेगळ्या आवाजांसाठी वेळा ठरलेल्या आहेत कदाचित इथल्या रुलबुकमध्ये कारण एकदा सकाळी पावणे सात वाजता आम्ही बस पकडायला स्टॉपकडे पळत चाललो होतो. आमच्या पायांच्या आवाजामुळे जवळच असलेल्या बेकरीमधले आजोबा बाहेर आले वसक्कन वसकलेच आमच्यावर, "इथे सकाळी सातच्या आत पायांचा आवाज नाही करायचा, एवढं माहिती नाही तुम्हाला! पळू नका चालत जा." हे ऐकुन लेक तर टरकलाच बिचारा. तेव्हापासून भर दिवसाही पळायची भीती बसलीये.
  
   पण "अगा जे घडलेची नाही" असं काहीसं झालं. अचानक ४-५ गाड्यांचे हॉर्न ऐकु यायला लागले; तेही अगदी जोरात आणि तालासुरात.जवळच्या सगळ्या दुकानांमधून लोक बाहेर आले नक्की काय चाललंय ते पाहायला. माझ्या सहित आजूबाजूचे सगळे लोक गाड्या येत होत्या त्या दिशेने बघायला लागले. मी पण जागीच थबकले आणि "आँ" असे भाव चेहऱ्यावर आले. बाकीच्या लोकांच्या चेहऱ्यावर "काय कटकट आहे" तत्सम भाव. त्याला कारणही तसेच होते. ती लग्नाची वरात होती!! मला गंमतच वाटली. वरात जर्मन लोकांची नव्हती पण, तुर्कीश होती. "परवानगी बरी मिळाली त्यांना" असा बालिश विचार मनात आला. जसं काही लेकाच्या मुंजीची वरात काढायची परवानगीच नाकारलीये मला. 

  असाच अजून एक विलक्षण अनुभव आला. मागच्या आठवड्यात आम्हाला फोन आला की घरात नवीन "स्मोक डिटेक्टर्स" बसवायचे आहे. तुमचा वेळ सांगा त्यावेळी आमचे लोक बसवून जातील. आम्ही वेळ सांगितली. शुक्रवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता बेल वाजली. मला वाटलं एखादा मनुष्य असेल पण दार उघडल्यावर अक्षरशः धक्काच बसला. वयवर्षे ७० ते ७५ च्या आसपासचे आजी-आजोबा दारात उभे होते. माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य त्यांना कळलं बहुतेक कारण आजोबा जर्मन मध्ये म्हणाले " हो आम्हीच बसवणार आहोत स्मोक डिटेक्टर्स." 

  दोघेही घरात आले, मला आणि लेकाला प्रेमाने ग्रीट केलं आणि कामाला लागले. आजी सगळं पेपरवर्क तपासत होत्या आणि आजोबांनी डिवाइस लावायची तयारी सुरु केली. आजोबानी खुर्ची घेतली आणि चढायला लागले, तर लेक पटकन म्हणाला " मी मदत करतो तुम्हाला." आजोबा म्हणतात कसे " अरेवा हुशार आहेस तु. पण धन्यवाद. मी एकदम फिट अँड फाईन आहे." आजोबानी पटापट तिन्ही स्मोक डिटेक्टर्स लावून टाकले आणि आज्जीनी माझी सही घेतली. मी विचारलं कॉफी घेता का दोघे? तर मला नम्रपणे नकार दिला त्यांनी आणि म्हणाले "आम्हाला अजुन तीन ठिकाणी जायचं आहे. तुमचा मुलगा खूपच काईन्ड आहे. गॉड ब्लेस हिम!" आणि निरोप घेऊन निघून गेले. अशा अनपेक्षित गोष्टी घडल्या की फार मस्त वाटतं!!

सकाळी आपल्या आधी उठुन, नवऱ्याने विचारलेला "चहा टाकु का?" हा प्रश्न मात्र अनपेक्षितच्या लिस्टमध्ये नेहमीच पहिला असेल. 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                             

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

मिरची

 आज भाजीपाला, फळे वगैरे आणायला जवळच्या दुकानात गेले होते. दुकान म्हणताच नाही येत खरंतर कारण बऱ्यापैकी मोठं दुकान आहे, मॉलच म्हणुया. सगळ्या गरजेच्या वस्तु एकाच छताखाली. एकतर इथे सुट्टी असली की एकुणएक दुकानं बंद असतात. रविवारला जोडुन एखादी सुट्टी असेल तर त्याआधीच दुध इत्यादी गोष्टी आठवणीने आणून ठेवाव्या लागतात. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी दुकानं बंद असण्याची आपल्याला सवयच नाहीये. पण इथे आल्यापासून असल्या भयंकर गोष्टींची सवय होतीये हळुहळु!

    शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे आज बरीच गर्दी होती. मी आपलं माझं बास्केट घेऊन पेमेन्टच्या रांगेत उभी होते. हम जिस लाईनमें खडे होते है वो लाईन हमेशा... मुंगीच्या पावलाने पुढे सरकते! बिलिंग काउंटरला एक टॅटूड काकु होत्या. चेहरा सोडुन, काकुंच्या गळ्यावर, मानेवर, हातावर टॅटूवाल्याकडचे सगळे टॅटु होते बहुतेक. फक्त नाक आणि कान टोचलेले असतात अशा गैरसमजात लहानाची मोठी झालेल्या मला काकुंना बघुन कळले की नाक आणि कान न टोचता गाल, ओठ आणि भुवई टोचतात म्हणजे पिअर्सिंग की काय ते! काकुंच्या दोन्ही गालावर आणि ओठात मोरण्या होत्या आणि भुवयांना छोट्या रिंग्ज.

  रांगेतील सगळ्यात पुढे असलेल्या नव्वद वर्षीय आज्जींचे काकूंसोबत काहीतरी वाद चालले होते. त्यांना कुठलीतरी वस्तू परत करायची होती आणि काकु नाही म्हणत होती. असे नव्वदीचे आजी-आजोबा एकएकटे किंवा जोडीने हमखास दिसतात खरेदी करताना. वॉकर घेऊन चालतात. त्यांच्याकडे बघून नेहमी दोन टोकाचे विचार माझ्या मनात येतात. एक, बापरे या वयातही स्वतःचं सगळं किती व्यवस्थित करतात आणि दोन, आईगं या वयात यांना एकटंच सगळं करावं लागतं! असो.

  तर आजी-काकूंचा वाद सुटला एकदाचा आणि रांग थोडी पुढे सरकली. माझं  हे सगळं निरीक्षण चालू होतं त्यामुळे माझ्या समोर उभ्या असलेल्या ताईच्या सामानाकडे अजिबात लक्ष गेलं नाही. ती माझ्या समोरच असल्यामुळे तिच्या सामानाचं जेव्हा बिलिंग सुरु झालं तेव्हाच मी पाहिलं. ताई पिशवी घेऊन उभी होती आणि बिल झालेली एकेक गोष्ट पिशवीत टाकत होती. तिच्या सगळ्या वस्तूंचं बिलिंग काकू इतक्या शांतपणे करत होत्या की जसंकाही त्या बरेच वर्ष हिमालयात तपश्चर्या करून आल्या आहेत किंवा सहनशक्तीच बाळकडु त्यांच्या आईने घुटीमध्येच त्यांना दिलंय कारण ताईचं सामान बघुन मला बिलिंगवल्या काकूंचे चरणस्पर्श करावे वाटले!

  ताईच्या सामानात प्रत्येकी फक्त एक नग खालील गोष्टी होत्या - सफरचंद,बटाटा, टमाटा, कांदा, लसूण, काकडी, संत्री, लिंबू, गाजर, बेबीकॉर्न, प्लम, केळी, ब्रेड, छोटसं चॉकलेट, कांद्याची पात आणि सरतेशेवटी एकच छोटीशी हिरवी मिरची. त्या छोट्या मिरचीचेही व्यवस्थित वजन वगैरे करून काकुंनी बिल लावलं. किती सेण्टला एक मिरची पडली हो? असा प्रश्न ओठांपर्यंत आलेला मागे घेतला मी आणि उगाचच आपलं ताईचं बास्केट आणि बिलिंग काउंटर पुन्हा चेक केलं म्हटलं एखादं पालकचं पान किंवा कोथिंबिरीची दांडी विसरलेली असायची. तर खरंच  बेसिलची एक दांडी राहिली होती. ती दांडीही यथोचित सोपस्कार होऊन ताईच्या पिशवीत दिमाखात विराजमान झाली आणि बिल काकूंच्या कम्प्युटरवर पोहोचले. एवढं सगळं झाल्यावर बिलाचे पैसेही ताईने एक एक सेंट मोजुन दिले अक्षरशः आणि काकूंनीही हसतमुखाने बिलाचे पैसे घेऊन ताईला "बाय हॅव अ नाईस डे" विश केलं. हे सगळं बघुन एक विचार माझ्या मनात चमकुन गेला की असं काही पाहिल्यावर डोळे मिटायला मोकळी वगैरे बोलुन तर बसले नाहीये ना मी? उगी जीव वगैरे द्यावा लागायचा!!

   या धक्क्यातून कसबसं सावरून बिलिंगला सुरुवात झाल्यावर मात्र वाटलं की माझ्याजवळ असलेल्या चार लिटर दूध, २ किलो बटाटे, २ किलो कांदे, एक किलो टमाटे, अर्धा डझन केळी, २ मोठ्या कॅडबऱ्या आणि असं बरच काही सहित धरणीमातेने मला पोटात घ्यावे!!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                   #rajashrismunichdiaries

गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

अच्छे दिन

  आपण आपलं रोज WA वर आलेले गुड मॉर्निंग, गुड नाईट, शुभ सकाळ, शुभ रात्र, शुभ दुपार, सुविचार, जागतिक अमका दिवस, ढमका दिवस, हे खा - ते खाऊ नका, वपुंचे वाक्य पुलंच्या नावाने लिहिणे, गेला बाजार नाना, नांगरे इत्यादी इत्यादी मेसेज निगुतीने डिलीट करावे (चित्रमय असेल तर डाऊनलोडही न करता). इतकं प्रचंड ज्ञानामृत उभ्या आयुष्यात मिळालं नाही जे आजकाल WA आणि FB वर मिळतं. इतकी संस्कारी शाळा शिक्षकांनीही कधी घेतली नाही आपली. असो.

   एक दिवस ईमेल चेक करताना एका मेलने लक्ष वेधुन घेतले. एका जर्मन काकांनी मेल केला होता. मेलमध्ये लिहिले होते कि "तुमचा प्रोफाइल अमुकतमुक ट्रान्सलेशन साईटवर दिसला. तुम्ही भारतीय आहेत हे कळाले.मला तुम्ही जरा मदत केलीत तर चांगलं होईल. हिंदी-जर्मनमध्ये अनुवाद करून देऊ शकतात का आपण? माझ्याकडे काही फार मोठे डॉक्युमेंट्स नाहीत, अधुनमधून छोट्या फाईल्स किंवा टेक्स्ट मी तुम्हाला पाठवेन." मी उत्तरादाखल "हो" म्हणून कळवले. पण माझी उत्सुकता मला शांत बसु देईना, म्हणुन मी काकांना मेलमध्ये विचारलेच, "नक्की कोणत्या डोमेनमधले काम आहे ट्रान्स्लेशनचे?" काकांचे उत्तर आले की "डोमेन वगैरे काही नाही साधे वाक्य आहेत. जमेल ना तुम्हाला?" मी पुन्हा मेल केला "कृपया एखादा नमुना पाठवला तर मला लक्षात येईल."


  यावर काकांचं जे उत्तर आलं त्या उत्तराने "Karma is a बी**" ह्या उक्तीवर पूर्णपणे विश्वास बसलाय माझा. काकांनी मला मेलमध्ये अनुवादासाठी पाठवलेले वाक्य-


 *```👁आँख दुनिया की हर एक चीज देखती है, मगर जब आँख के अन्दर कुछ चला जाए तो उसे नहीं देख पाती.....

```**```बिल्कुल इसी तरह इंसान दूसरो कि गलती तो देखता है पर अपनी गलती उसे नजर नही आती है।```*

निंदा से घबराकर अपने लक्ष्य को ना छोड़े.

क्योंकि लक्ष्य मिलते ही निंदा करने वालों की बदल जाती है... 
सुप्रभात

   हे वाचून भोवळ कि काय म्हणतात तेवढीच यायची बाकी होती. कहर म्हणजे काकांनी मेलमध्ये लिहिलंय की त्यांचा एक भारतीय फेसबुक फ्रेंड त्यांना असे मेसेजेस WA वर पाठवतो म्हणे आणि म्हणतो कि तू तुझा अर्थ शोध! ती नक्कीच फेसबुक फ्रेंडीन असावी अशी मला दाट शंका आहे खरंतर कारण हे भारी काका पैसे देऊन ह्या मेसेजेसचा अनुवाद करून घेत आहेत म्हणून वाटलं आपलं!झुकरबर्गांच्या मार्कनी खुप होतकरूंना कामाला लावलं खरंच.अजुन किती अच्छे दिन पाहिजे म्हणते मी!!


   काका मला एक दिवसाआड असे सुंदर सुंदर वाक्य मेल करतात आणि मी त्यांना अनुवाद करून पाठवते. तर ह्या स तर हे धन्य काका आता गळ्या जर्मन अनुवादांचे एक सुंदर पत्र लिहावं आणि मॅगी काकूंच्या दारात ठेऊन द्यावं म्हणतेय!! ते सिक्रेट सँटा कि काय असतं ना काहीतरी!!


 सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                             #rajashrismunichdiaries 

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

चवदार

रविवारची बोअरिंग संध्याकाळ... त्यात मी विचारलं " फुलकोबीची भाजी करू का?"... इतका भयंकर प्रश्न विचारल्यामुळे घरात प्रचंड विरोध आणि निषेधाचं वातावरण तयार झालं... भारतात उद्या होईल... पोस्ट अजिबात राजकीय नाहीये त्यामुळे राजकीय रंग देऊ नये.. असो.
तर अशा बोअरिंग संध्याकाळी मोठा फुलकोबीचा गड्डा बघुन प्रचंड दडपण आलं... म्हणून मग युट्युबला शरण जाऊन.. फुलकोबीला मस्त खुसखुशीत बनवलं... फुलकोबीच्या नावाने नाकं मुरडणाऱ्यानी "वाह..वाह" म्हणुन मुटुमुटू संपवला हा पदार्थ... फुलकोबीचे मन्चुरअन स्टाईल भजे!
कोणत्याही प्रकारचे भजे केल्यावर कांदाभजी केली नाहीत तर पाप लागतं, हो ना? म्हणून मग रविवारच्या बोअरिंग संध्याकाळला अजून खुमासदार करण्यासाठी कांदाभजी... बाहेर पडणारा पांढराशुभ्र बर्फ आणि घरात मस्त खुसखुशीत भजे आणि मसाला चहा.. अहाहा!!
खूप दिवसांनी रविवार संध्याकाळ चवदार झाली!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                 


मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

फिलिंग भारतात असल्यावानी...

महत्वाच्या कामासाठी घरातून निघायलाच उशीर होणे. 
म्यूनिचमध्ये आल्यापासून पहिल्यांदाच चक्क ट्रॅफिक जॅम मध्ये बस अडकणे आणि कर्मधर्मसंयोगाने तुम्ही त्याच बसमध्ये असणे. पंधरा मिनिटांच्या प्रवासाला एक-सव्वा तास लागणे. 
बसमधील प्रामधारी लेकराने ट्रॅफिक जॅमला कंटाळुन पुर्ण प्रवासभर रडका सूर आळवूण समस्त बसवासियांचे मनोरंजन करणे. बसवासियांनी आणि  बसचालकाने वेगवेगळे लूक देऊनही प्रामधारी लेकराची आई स्थितप्रज्ञ असणे.
त्या प्रामधारी लेकराच्या माऊलीची सहनशक्ती पाहुन तुमच्या सहनशक्तीविषयी (लेकासाठी असलेली) तुम्हाला प्रचंड कॉम्प्लेक्स येणे.
कसंतरी ट्रॅफिक जॅममधुन बाहेर पडून, स्टॉपवर उतरून, बावळटसारखं सायकल ट्रॅकवरच उभं राहुन भारतीय दूतावासाचा पत्ता शोधणे आणि मागुन आलेल्या सायकलवाल्याने "काय अडाणी बाई आहे" असा लुक देणे. 
बरोबर वेळेवर इंटरनेट आणि गुगल मॅप्स लोड व्हायला उशीर झाल्याने पत्ता शोधत चारीही दिशांना भटकणे आणि गुगल मॅप्स लोड झाल्यावर तुमच्या लक्षात येणे की तुम्ही बरोबर उलट्या दिशेला अर्धा किलोमीटर पुढे गेलेले आहात. म्हणून पुन्हा आल्या पावली परत जाणे. 
भारतीय दूतावासासमोरील तिरंगा पाहून मन भरून येणे. 
कामाची वेळ संपायच्या फक्त वीस मिनिटे आधी ऑफिसला पोहचणे आणि तिथला अधिकारी फॉर्म घेण्याच्या खिडकीत नसणे. तुमच्या आधी आलेल्या बऱ्याच लोकांनी टोकन मशीन मधुन वचावचा(एकाच वेळी फर्रर्रर्रर्र करून ३-४ टोकन) टोकन घेणे आणि त्यातले एक टोकन जवळ ठेऊन बाकीचे कचऱ्यात टाकणे. कचऱ्याचा डबा वेगवेगळ्या कागदपत्रांनी आणि टोकन्सनी भरून वाहणे, इतस्ततः कागदी कचरा सांडलेला असणे. 
एक महाभाग तुमच्या बाजुलाच येऊन बसणे ज्यांना फॉर्म कसा भरायचा हे माहित नसणे. त्यांनी प्रत्येक वाक्याचा तुम्हाला अर्थ विचारणे आणि सांगितल्यावर,  वाक्यागणिक म्हणणे "ये सही तो है ना? नही तो मुझे फिरसे नया फॉर्म भरना पडेगा." 
.  
पाच मिनिटांनी अधिकाऱ्याचे आगमन होणे आणि तुमच्या आधी अख्ख एक कुटुंब (हम दो हमारे दो) पासपोर्ट रिन्यू करायला असणे. त्या अधिकाऱ्याची आणि कुटुंबप्रमुखाची आधी इंग्लिशमध्ये सुरुवात होऊन नंतर राष्ट्रभाषेमध्ये शाब्दिक बाचाबाची होणे. 

अ: This form is not properly filled. 
कुप्र : Its okay, I will fill that now. You please check other forms. 
अ: What is this? Birth place की जगह birth date लिखा है आपने. बच्चे के नाम के जगह अपना नाम लिखा है. ये फोटो किस साईज के है? ५ बाय ५ के चाहिये. आपके वाईफकी सिग्नेचरकी जगह आपने अपने सिग्नेचर किये है. 
कुप्र: सर एकही फॉर्म मी गलती हुई है आप अड्जस्ट कर लिजिए ना. 
अ: एक फॉर्म में नही सभी फॉर्म में गलत है. आप लोग ऐसे कुछ भी फॉर्म भरके लेके आते हो और हमें गलिया देते हो कि पासपोर्ट गलत छपवाया. आप कल आईये. 
कुप्र: सर प्लिज देखिये ना कुछ अड्जस्ट होता है तो. बच्चे लेकर इतनी ठंडमें फिरसे आना पडेगा. 
अ: नही भाई, टाईम खतम हो गया, आप कल आईये. 
अशा प्रेमळ संवादानंतर, तुमचा टोकन नंबर स्क्रीनवर झळकणे आणि वैतागलेल्या अधिकाऱ्याने तुमचा फॉर्म नीट न पाहताच, हे नाहीये ते नाहीये उद्या या असे राष्ट्रभाषेतच सांगणे. तरीही दिल चाहता है मधील सैफ सारखे तुम्ही मध्ये मध्ये काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणे आणि तो फसणे. जसं की -

अ: ये क्या है? यहाँ सिग्नेचर क्यु नहीं है?
मी: लेकीन ये तो... 
लगेच अ: ये विजा पुराना है 
मी: आप ठिकसे.. 
लगेच अ: कार्ड की कॉपी नही है
मी: मगर हमें तो... 
लगेच अ: मॅडम टाईम खतम हो गया, आप कल आईये. 

आणि खिडकी बंद होणे. 
"आ बैल मुझे मार" या उक्तीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही नवऱ्याला स्वतःच फोन लावुन वरील अनुभवाचे कथन करणे आणि त्याच्या शिव्या खाणे. 
मी तेच म्हटलं, खुप दिवसांपासून फार चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं मला. आज कळालं मी काय मिस करत होते ते!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                                          #rajashrismunichdiaries

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

धडा

आजच WA वर "vitamin N" असा काहीतरी व्हिडीओ पाहिला. मुलांना "नाही" ऐकायची सवय लावा वगैरे वगैरे; कुठलेतरी फॉरेनचे काका सांगत होते म्हटल्यावर आपल्याकडचे लोक आवर्जुन शेअर करणार. आमच्यासारखे पालक मुलांनी काही मागायच्या आतच नाही म्हणून मोकळे होतात आणि बरेचसे भारतीय पालक मुलांना फक्त नाहीच ऐकवतात हे त्या काकांना माहित नसावं बहुधा.

तर हे "नाही" म्हणण्यावरून इथे आल्यानंतरची पहिली मॉल व्हिजिट आठवली. लेक तसा लहान होता तेव्हा आणि भारतीय विचारसारणीचाही होता (आता जर्मन रुलबुक घेऊन फिरतो आणि आम्हा दोघांना शिकवत राहतो ती गोष्ट वेगळी). इथे शनिवारीच काय असेल नसेल ती खरेदी करावी लागते; रविवारी एकही मॉल अथवा दुकान उघडं नसतं. सुट्टी म्हणजे सुट्टी. शनिवारी आम्ही आपले मॉल फिरायच्या उद्देशाने बाहेर पडलो. तर लेकाने ट्रेनमध्येच भुणभुण सुरु केली. " मग तिथे तु मला काय घेऊन देणार ते सांग तरच मी येतो." मी म्हटलं " तु चल तर मग बघु ". पण त्याने तिथे जाईपर्यंत भुणभुण चालुच ठेवली. शेवटी मी रागावलेच त्याला. मग जरा शांत बसला. पण आम्हा मायलेकाचा हा प्रेमळ संवाद ऐकून ट्रेनमधील जनता भारावून गेली.

त्या मॉलमध्ये स्टेशनवरून आत जायचा रस्ता एका मोठ्या दुकानातून जातो. आणि बरोबर तिथेच त्यांचं खेळण्यांचे सेक्शन आहे. झालं, आम्ही आत शिरलो कि लेकाला खेळण्यांचे सेक्शन दिसलं आणि तो तिकडेच धावला. हेच घ्यायचं, तेच घ्यायचं, नाहीतर मी पुढे येतच नाही, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. आम्ही दोघेही प्रत्येक गोष्टीला "नाही" एवढंच म्हणत होतो. त्याला जरा समजावलं की सध्या तु इथून चल आपण जाताना बघु. कसंतरी निघाला तो तिथुन. पण पुढे मी ज्या ज्या दुकानात जात होते त्या प्रत्येक दुकानात त्याने अक्षरशः जीव नकोस केला.

शेवटी माझ्या सहनशक्तीच अंत झालाच आणि मी जरा जोरात त्याला रागावले आणि थोडा हात उगारल्यासारखं केलं (माझं नशीब जरा बरं असावं त्या दिवशी म्हणून मी त्याला धपाटा नाही घातला पाठीत, नाहीतर..). त्याने लगेच रडायला सुरुवात केली म्हणुन आम्ही एका ठिकाणी बसलो आणि त्याला शांत करायला लागलो तर आम्हाला दिसलं की एक पोलीस मामा आमच्याकडेच पाहत आहेत. आम्हा दोघांची जाम टरकली. म्हंटल कोणी कंप्लेंट केली की काय आमची. इकडच्या लोकांचं काही सांगता येत नाही. इथले कायदे पण भारी आहेत. "मुलांना मारायचं नाही" हा कायदा आहे. त्यासाठीही तुम्हाला शिक्षा होते. रस्त्यावर जर एखादे आजोबा/आजी चुकून चालताना पडले किंवा कोणाचा तरी ऍक्सीडेन्ट झालाय आणि तुम्ही तिथे असाल आणि तुम्ही त्यांना मदत केली नाही तर तुम्हाला कायद्याने शिक्षा होते.

आम्ही आपलं घाबरलेल्या अवस्थेत कसंतरी लेकाला समजावलं आणि तिथून पोबारा केला. स्टेशनवर पोहोचलो तर नेमकी ट्रेन आताच गेलेली आणि पुढची ट्रेन यायला १० मिनिट. तिथे बसलो तर पोलीस मामा तिथे आले. त्यांची संशयित नजर आमच्यावर रोखलेली आणि त्यात लेकाची भुणभुण सुरूच. त्यात पुन्हा नवऱ्याचं अजून तिसरच, "तरी मी तुला सांगत असतो, त्याच्यावर चिडत जाऊ नकोस, तू ऐकशील तर शपथ." आता जर का लेक सतत तुमच्या कानाशीच "आई, आई" करत असेल तर आणि पूर्ण मॉलभर तुमच्या जॅकेटला (ओढणी नसल्यामुळे) पकडून मागमागे भुणभुणत हिंडत असेल तर कितीवेळ पेशन्स टिकणार, नाही का?

मी आपला मनात देवाचा धावा करत होते "देवा पोलीस मामाला इथून घेऊन जा रे बाबा". पण कर्माची फळं इथेच भोगावी लागतात म्हणे त्यामुळे देवही धावला नाही. आणि पोलीस मामाच आले धावून.. म्हणजे ते न राहवून आले जरा आमची विचारपुस करायला. त्यांनी सरळ लेकालाच जर्मन मधून प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण पुन्हा माझं नशीब आडवं आलं, लेकाला तेव्हा जर्मनचा ज पण येत नव्हता.. हुश्श.. नाहीतर आईच्या पापांचा पाढा वाचला असता त्याने जर्मनमध्ये. असो.

पोलीस मामाना इंग्लिश फार चांगली येत नसल्यामुळे कसबसं तोडकंमोडकं "Is everything okay?" असं लेकाला त्यांनी विचारलं. आणि आमच्या सुपूत्रांनी त्या वेळी अक्षरशः आमच्यावर उपकार केले आणि म्हणाले " yeah fine." आम्ही कानात प्राण आणुन ह्याच उत्तराची वाट पाहत होतो दोघे, कारण जर लेक नाही म्हणाला असता तर पुढे काय झाले असते ते पोलिस मामाच जाणे. इथे मुलांना आधी विचारतात, आईबापाला नाही. मुलांनी आईबाप चांगले आहेत हे एकदा अप्रूव्ह केलं की "कोई माईका लाल आईबापको बुरा नाही बोल सकता!!" लेकाच्या उत्तराने समाधान होऊन पोलिसमामा शेवटी त्यांच्या वाटेने निघुन गेले आणि आम्ही "वसुदेव व देवकी" होता होता वाचलो.

तर इथे मी फार मोठा धडा शिकले कि मुलांचा कितीही राग आला तरी पब्लिक प्लेसमध्ये हसत हसत मराठीत रागवायचं किंवा मुलगा आणि त्याचे बाबा हे आपल्याबरोबर नाहीतच असं समजायचं, जमतं ते!! आई मुलांना रागावणार नाही, असं कधी होत असत का??


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #rajashrismunichdiaries

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

निर्णय

  एखाद्या माणसाच्या आयुष्यात कधीकधी खुप निर्णायक क्षण येतात जिथे त्याच्या समोर दोन पर्याय असतात आणि त्यातला एक निवडणं त्या क्षणी अत्यंत महत्वाचं असतं. अगदी जीवन मरणाचा प्रश्नच म्हणू या ना, त्या माणसासाठी तरी अशीच परिस्थिती असते त्या वेळी. तो, ज्याने त्या निर्णायक क्षणापर्यंत खुप कष्ट घेतलेले असतात, त्या एका गोष्टीसाठी वाट पाहिलेली असते. आणि एका हताश वेळी, ती गोष्ट त्याच्यासमोर येते पण अजून एक पर्याय घेऊन, जिथुन पुढे त्याला दोन रस्ते दिसत असतात. रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. पण तरीही एक पर्याय निवडणं ही त्या क्षणाची फार मोठी परीक्षा असते. तशा या परीक्षा थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात आणि स्वतःच्या परीने माणुस ती परीक्षा पास अथवा नापास होत असतो.

 तर, त्याच्याही आयुष्यात ही परीक्षेची वेळ आली. तो, एक उच्चशिक्षित मध्यमवर्गीय तरुण, ज्याला आईवडिलांनी खूप कष्टाने शिकवलं पण नोकरी मिळवण्यासाठी त्याला फार कष्ट पडले आणि त्याच दरम्यान तो निर्णायक क्षण त्याच्या आयुष्यात आला. नोकरी मिळत नसल्याने खूपच हताश झाला होता तो, तेव्हाच वडिलांच्या एका स्नेह्यांनी त्याच्या गावी एका कंपनीमध्ये त्याच्यासाठी शब्द टाकला. २ दिवसांनी त्या कंपनीमध्ये त्याची मुलाखत ठरली. त्या वेळी तो पुण्यात एका कोर्ससाठी रहात होता. कोर्स पूर्ण करुन नोकरीसाठी अर्ज करणे चालुच होतं त्याचं पण कुठूनही प्रतिसाद येत नव्हता. तेवढ्यात त्याला वडिलांनी गावी ये म्हणून सांगितलं.

  त्याला वाटलं आलेली संधी सोडू नये म्हणून तो लगेच गावी जायला निघाला तरी त्याच्या मनात रुखरुख होतीच की ज्या क्षेत्रात पाहिजे तिथला जॉब नाहीये हा पण वडिलांच्या शब्दाखातर त्याने गावाला जाण्याची बस पकडली. बस मध्ये त्याच्या डोक्यात निरनिराळे विचार पिंगा घालत होते तेवढ्यात त्याला पुण्यातील कोर्स केलेल्या इन्स्टिट्युट मधुन फोन आला कि २ दिवसांनी सकाळी १० वाजता अशाअशा कंपनीत तुमची मुलाखत आहे वेळेवर हजर रहा. दोन्ही मुलाखती एकाच वेळेला पण दोन वेगवेगळ्या गावांना आणि दोन वेगवेगळ्या क्षेत्रात.

 हाच तो खूप मोठी परीक्षा पहाणारा क्षण! मनाची खुप घालमेल, एकीकडे वडिलांनी दिलेला शब्द तर दुसरीकडे मनाजोगतं क्षेत्र. पण तरीही दोन्हीही ठिकाणी यश त्यालाच खेचून आणावं लागणार होतं. पण त्याचा हा निर्णय त्याच्या आयुष्यावर दुरगामी परिणाम करणार होता. गावी जाऊन आई वडिलांशी शांतपणे चर्चा करून त्याने शेवटी पुण्याच्या कम्पनीची मुलाखत द्यायचा निर्णय घेतला आणि लगेच २ तासांनी तो पुण्याला रवानाही झाला.

 मुलाखत यशस्वी ठरली आणि ती नोकरी त्याला मिळाली. खरंतर ती एक छोटी कम्पनी होती आणि पगारही मनाजोगता नव्हता. पण त्या कामाच्या अनुभवावर पुढे थोड्याच दिवसात एका मल्टिनॅशनल कंपनीत त्याला मस्त जॉब मिळाला आणि त्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे!

 आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर असे निर्णय घ्यायची वेळ येते आणि समोर दोन पर्याय असतात. पण असे निर्णय सगळ्यांचेच बरोबर ठरतात का हो? त्यावेळी निवडलेला रस्ता चुकला तर? ज्यांची ह्या प्रश्नांची उत्तरं "नाही" अशी आहेत त्या लोकांना होणाऱ्या यातना फार भयंकर असतात. पुन्हा कधी ते त्या चुकलेल्या निर्णयातुन सावरू शकत नाहीत असं मला वाटतं! त्याच चुकलेल्या निर्णयाने आयुष्याची वाताहत केली तर त्याने निवडलेल्या पर्यायलाच "नशीब" असं म्हणत असतील का?


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                     #nirnay     
    

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

जादु संगीताची

   तुम्ही प्रचंड उद्विग्न अवस्थेत असता, वेगवेगळे विचार डोक्यात अक्षरशः थैमान घालत असतात आणि लेक पटकन जवळ येऊन म्हणतो " आई मी तुला एक खूप भारी गाणं सांगतो, तु ऐक, बघ तुला एकदम Happy वाटेल". खरंतर कोणतेही गाणं वगैरे ऐकण्याच्या मनःस्थितीत तुम्ही अजिबात नसता, पण लेकाचे आर्जवं पण डावलायची इच्छा होत नाही. म्हणून मग विमनस्क अवस्थेत तुम्ही youtube ला Pharrell Williams चे  - Happy song लावता. आणि काय आश्चर्य गाणं ऐकता ऐकता तुम्हाला खरंच आनंदी वाटायला लागतं. मस्त नाचावं वगैरे वाटायला लागतं. त्यानंतर लेकानी सुचवलेले वेगवेगळे गाणे ऐकुन खूप छान वाटतं. सगळं उद्विग्नतेचं मळभ दूर निघून जातं!! संगीतात जादू असते म्हणतात ते काही खोटे नाही. भाषा जरी समजत नसली तरी भावना संगीतातूनच पोहोचतात. कारण इंग्लिश किंवा जर्मन गाण्यातले सगळेच शब्द पटकन समजत नाहीत तरीही हि गाणी ऐकावीशी वाटतात. आपल्याकडे तर प्रचंड खजिना आहे गाण्यांचा. आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींशी रिलेट होणारे असंख्य गाणे आहेत.

  गाण्याविषयी लिहितेय म्हणुन एक मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट आठवली. मी लहान म्हणजे साधारण ४-५ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी रेडिओ कम टेपरेकॉर्डर घेतला होता. माझ्या वडिलांना मोहम्मद रफी प्रचंड आवडतात. त्यावेळी ते जास्त रफीचेच गाणे ऐकायचे. रफीचे सगळे फेमस गाणे त्यावेळी माझ्या  कानावरून वारंवार जात होते. तेव्हा किशोर कुमार अजून फेमस व्हायचे होते. मोठं झाल्यावर जेव्हा जेव्हा रफी
ची गाणी ऐकली तेव्हा जाणवलं कि मला प्रत्येक गाण्याचा शब्द न शब्द पाठ आहे. तसा अजूनही बऱ्यापैकी पाठ आहे. "एहसान तेरा होगा मुझपर", "तारीफ करू क्या उसकी", दिवाना हुआ बादल", "लाखों है निगाह में" हे आणि असे बरेच गाणे. इतकं भारी वाटलं ना! त्यानंतर किशोरला ऐकायची गोडी लागली आणि अभ्यास सोडून वारंवार ऐकलेली गाणीच डोक्यात बसायला लागली.

  तीच गत "अंदाज अपना अपना" सिनेमाची. कॉलेजमध्ये असताना आम्ही मैत्रिणींनी अक्षरशः पारायणं केली होती ह्या सिनेमाची. तेव्हा एका मैत्रिणीकडे VCR होता. तिच्याकडे अभ्यासाला जाऊन आम्ही सिनेमा बघत बसायचो. आम्हा सगळ्यांना प्रत्येक डायलॉग पाठ आहे सिनेमाचा. आमिर आणि सलमान तेव्हा बरे दिसायचे एकंदर. पण सिनेमा भारी जमलाय हा. आता पुन्हा एकदा त्याच सगळ्या मैत्रिणींसोबत बघायचा आहे एकदा. आणि तीच मजा अनुभवायची आहे, बघु कधी योग येतो ते!

  लिहीत होते इंग्लिश गाण्याविषयी आणि पोहोचले हिंदी सिनेमावर ह्यालाच म्हणतात " फिर भी दिल है हिंदुस्थानी"!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                  

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

Winter is coming..

  आता उद्या सकाळी उठलं कि घरातलं अनालॉग घड्याळ मोबाईल मधील घड्याळाच्या एक तास पुढे असेल आणि तेव्हाच जाणीव होईल कि डेलाईट सेविंग टाईम संपलाय. सगळी घड्याळं एक तास मागे होतात. विचित्रच वाटतं काहीतरी. बॉडीक्लॉक अड्जस्ट होतच नाही पटकन. रोजच्यासारखं सकाळी सहाला उठायची सवय असल्यामुळे पाचलाच जाग येईल. चित्रविचित्र वेळांना भूक लागेल. चित्रविचीत्र म्हणजे स्वयंपाकही झालेला नसताना भूक लागेल.

  हळूहळू दिवस इतका लहान होत जाईल की ५ वाजता सूर्य मावळेल आणि सकाळी ८ ला उजाडेल. संध्याकाळी  ६ वाजता मिट्ट काळोख होतो. त्यात सतत आभाळ, प्रचंड थंडी, डिसेंबर पर्यंत पाऊस त्याच्यासोबत धुकं आणि त्यानंतर बर्फ पडत राहील. दिवसभर आभाळ असल्यामुळे सूर्यदर्शन फार कमी वेळेला होतं. इतकं उदास वातावरण असतं कि बास! सूर्यप्रकाश असला तरी जास्तीत जास्त ४ तास असतो आणि थंडी इतकी असते कि सूर्य दिसला काय किंवा न दिसला काय काही फरक पडत नाही.

   सगळ्या झाडांची पाने गळून ते ओकेबोके दिसतील. त्यामुळे तर अजून उदास वाटेल. त्यात इथले लोक उदास रंगाचेच कपडे घालतात आणि उदासच वाटतात. आपल्या भारतीयांसारखे रंगीबेरंगी लोक फार कमी किंवा नाहीतच. गच्च भरलेल्या ट्रेन्स मधेही काडीचाही आवाज नसतो लोकांचा. कमाल आहे बुआ! आम्ही दोन भारतीय मैत्रिणी ट्रेनमध्ये गप्पा मारत असलो तर आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भावच फार बोलके असतात. असो.

   नोव्हेंबर ते मार्च असच वातावरण. डिसेंबर-जानेवारी मध्ये थंडी तर जीव घेते अगदी! मागच्या वर्षी सगळ्यात कमी -२० डिग्री तापमान गेले होते. इतक्या कमी तापमानात आपण जगू शकतो याची अनुभुती आली. बर्फ पडायला लागला कि मस्त वाटायला लागतं पण. मऊशार, कापसासारखा स्वच्छ पांढरा. लहानपणी म्हातारीला पकडायला धावायचो तसं बर्फ हातावर झेलायला फार मस्त वाटतं! बर्फ फार जिव्हाळ्याचा विषय आहे इथल्या लोकांसाठी. आपल्याकडे कसं पाऊस कमी झाला एखाद्या वर्षी तर सगळ्यांच्या जीवाला घोर लागतो तसाच काहीसं. एखाद्या वर्षी बर्फवर्षाव कमी झाला तर इथल्या लोकांना वाईट वाटतं.

 तर असा हा युरोपिअन हिवाळा.. नकोसा वाटत असला तरी हवाहवासा!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                            #munichdiaries

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

सहज सुचलेले

  • मस्त गुलाबी थंडी...

          त्यात थोडाथोडा पाऊस...
          हिलस्टेशनवर असल्यासारखं मेट्रोचं स्टेशन...
          ट्रेन वीस मिनिट लेट...
          अशा मस्त वातावरणात...
          एखादा....
         .
         .
         .
         .
         .
         .
         .
         .
         गरमगरम अमृततुल्य चहा आणि झणझणीत वडापाव मिळाला तर...
         बस ईतनासा ख्याब है!

  • मी - (अतिउत्साही स्वरात) अरे आज दुपारी मी योगामॅटचं उदघाटन केलं बरं!!
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    तो - (मोबाईल मधुन शांतपणे डोकं वर काढुन) अरे वा! वामकुक्षी घेतली वाटतं..
    सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #munichdiaries



सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

पडु आजारी..मौज न वाटे भारी..

म्युनिचला आल्यापासून आलेल्या अनुभवांवरून मी आता मनाशी खालील गोष्टींची पक्की खूणगाठ बांधलीये

- आजारी पडायचं असेल तर फक्त सोमवार ते शुक्रवार १२ च्या आत; कारण शुक्रवारी दुपारपासून ते सोमवारी सकाळपर्यंत फक्त मरणासन्न लोकांना तात्काळ ट्रीटमेंट मिळते. आणि बाकी आपल्यासारख्या लोकांना तापात फणफणत शासकीय दवाखान्यात ३-४ तास वाट पाहावी लागते.
- पुढील आठवड्यात आपण आजारी पडणार हे समजण्याची कोणती तरी व्यवस्था करणे किंवा "गट फीलिंग (अंतरात्म्याचा आवाज वगैरे)" साठी ध्यानधारणा करणे; कारण आपण नेहमी जात असतो त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट नेहमीच पुढील आठवड्याची मिळते इथे.
- येनकेनप्रकारे तुम्ही लकीली वीकडेज मध्ये आजारी पडलात तर बिना अपॉइंटमेंट क्लीनिक मध्ये गेल्यामुळे सगळ्यात शेवटी तुमचा नंबर लागतो आणि रिसेप्शनिस्ट विचारतेच "अपॉइंटमेंट का नाही घेतली?"  तेव्हा खरंच म्हणावं वाटतं "उठाले रे बाबा"! असो.
- साधे सर्दीपडसे किंवा ताप कोणत्याही औषधाविना आणि डॉक्टरविना पूर्णपणे बरे होऊ शकतात यावर माझी पूर्ण श्रद्धा बसलीये कारण तसेही इथे सर्दीपडशाला वाफ घेणे आणि संत्र्याचे, अननसाचे ज्युस पिणे हे उपाय डॉक्टर सांगतात. आणि घसा खराब होऊन ताप असेल तर पॅरासिटामोल देऊन पुन्हा २ दिवसांनी या असे सांगतात. दोन दिवसांनी जेव्हा तापाने तुमची पूर्ण वाट लागते तेव्हा ब्लड, युरीन चेक करूनच तुम्हाला अँटिबायोटिक्स देतात, नसता नाही देत. अँटिबायोटिक्सचा वापर फारच कमी आहे(हि गोष्ट वाखाणण्याजोगी आहे) आणि प्रिस्क्रिप्शन शिवाय एकही औषध मिळत नाही. 
- स्त्रियांना प्रेग्नन्सी सोडून कोणताही दुसरा प्रॉब्लेम असेल तर त्यांना स्त्रीरोगतज्ञाची अपॉइंटमेंट ४-५ महिन्यानंतरची मिळते आणि फारच तातडीची परिस्थिती असेल तर शासकीय दवाखान्यात ३-४ तास वाट पाहावी आणि जे काय होतं आहे ते जर्मन मध्ये पाठ करून ठेवावे. जर्मन भाषा येत नाही म्हटले कि इथल्या ९०% लोकांच्या डोक्यात तिडीक जाते आणि ते आपल्याकडे विचित्र नजरेने पाहतात.
- मेडिकल इन्शुरन्स कार्ड नसेल तर आजारी पडायचा आणि दवाखान्यात पाऊल टाकायचा कोणताही हक्क तुम्हाला नाहीये. म्हणजे आपल्यासारख्या फॉरेनर्सला तरी!
- नवीन पेशन्टला कोणत्याही क्लीनिकची अपॉइंटमेंट कमीतकमी ३ महिन्यांनंतरची मिळते त्यामुळे कोणताही आजार नसताना सगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टर्सकडे उगीचच अपॉइंटमेंट घेऊन ठेवाव्यात न जाणो कधी काय बिघडेल तुमचं.
- तुम्ही शाकाहारी का आहेत ह्याविषयीचे विचार डॉक्टरच्या मनावर ठसवणे तुम्हाला जमलेच पाहिजे.
- सहनशक्ती तर वाढलीच आहे आता रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे म्हणजे असे कोणतेही प्रकार करायची वेळच येणार नाही.
- आई म्हणते तसे "शरीर रक्षितो धर्म:" हे सूत्र पालन करायचे. कारण दोन वेळा माझे दुखणे आपोआप बरे झाले कारण मला अपॉइंटमेंट पटकन मिळालीच नाही आणि ज्या दिवशीची अपॉइंटमेंट होती त्या दिवशी मी ठणठणीत बरी होते. 

एकंदर काय तर आपल्याकडे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात तसे मी इथे शहाण्या माणसाने दवाखान्याची पायरी चढू नये असं म्हणेन!!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                  #munichdiaries 

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

व्यसन.... सीरीजचे

आज सकाळपासून मन सैरभैर झालाय नुसतं. एक अनामिक हुरहूर लागली आहे. आता पुढच्या रविवारपासून काय? राहून राहून हा प्रश्न डोक्यात येतोय.. 
असं कसं करू शकतात ते. आता थेट पुढच्या वर्षी म्हणे. का 2019? नकोच तो विचार.. फार त्रास होतो.. पुढच्या वर्षी तरी लवकर या म्हणावं.. 
असं वाटतं आहे कि ते FB आणि WA वर येणारे मेसेजेस फॉरवर्ड आणि शेअर करावेत.. ते नसतात का "इस फोटो को एक मिनिट के अंदर लाईक या शेअर किजीये आपकी मनोकामना पुरी हो जाएगी", किंवा "इस मेसेज को १० लोगोकों भेजा तो आपके सारे काम १० मिनिट मी पुरे हो जाएंगे". असे काहीबाही उपाय डोक्यात येत आहेत. असो. 
आता तर हद्दच झाली.. इतकं व्यसनाधीन (मराठीत ऍडिक्ट) असल्यासारखं वागू नये माणसाने.. कोणी पाणी म्हंटलं तर "डॅनी", फोन म्हंटलं तर "जॉन" ऐकू येतंय, लेक डायनोसॉर म्हणाला तर मला "ड्रॅगन" वाटले. उगीचच वाटतंय कि नवरा "वाईट वॉकर्स " विषयी बोलतोय आणि मीही तावातावाने त्या "सिंहासन तलवारी (Throne)" वर कोण बसेल यावर चर्चा करतेय. तर तो माझ्याकडे "तु बरी आहेस ना?" नजरेने पाहतोय आज. पुढच्या सिजनला स्कायचं subscription घेतो कि नाही देव जाणे... 
काही नाही आपलं ते Game of Thrones च्या सीजन 7 चा आज last episode आहे... म्हटलं हा सीजन संपलाय त्या दुःखाला वाट मोकळी करून द्यावी... इतकंच...


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                                                #GOTdiaries

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

ऑक्टोबर फेस्ट

   म्यूनिच मधील ऑक्टोबर फेस्ट जगातील सर्वात मोठा लोकोत्सव आहे. बऱ्याच परदेशी लोकांना ऑक्टोबर फेस्ट जर्मनीची संस्कृती वाटतो. वास्तविक, ऑक्टोबर फेस्ट बायर्नची संस्कृती प्रतिबिंबित करतो, संपूर्ण जर्मनीची नाही. स्थानिक लोक या उत्सवाला "Wisen " म्हणतात. बायर्न हे एक जर्मनी मधील राज्य आहे.
    ह्या उत्सवाचा इतिहास पार १८१० मध्ये आहे. म्यूनिचमधील पहिला ऑक्टोबर फेस्ट १२ ऑक्टोबर १८१० रोजी तेव्हाचा राजकुमार प्रिन्स लुडविग (नंतर तो राजा लुडविग बनला) आणि सॅक्सनी-हिल्डबर्गहौसेनची राजकुमारी थेरेसे यांच्या लग्नात साजरा करण्यात आला. त्यावेळी हा उत्सव घोड्यांच्या शर्यतीसह संपुष्टात आला आणि पुढील वर्षी ही शर्यत पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. एका शेती विषयक शो व्यतिरिक्त , बियर स्टॉल, आनंदोत्सव आणि इतर करमणुकीच्या गोष्टीचा येणाऱ्या वर्षांमध्ये या महोत्सवात समावेश होत गेला. आता घोड्यांची शर्यत बंद झालीये पण ऑक्टोबर फेस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
    तुम्हाला असं वाटेल की नाव तर ऑक्टोबर फेस्ट आहे आणि सप्टेंबर मध्ये कसा? तर हवामान हे मुख्य कारण. सप्टेंबर सहसा थोडा उबदार असतो. त्यामुळे साधारण १६-१७ सप्टेंबरला सुरु होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी संपतो किंवा ३ ऑक्टोबरला संपतो. ३ ऑक्टोबर हा जर्मन री-युनिफिकेशन डे असतो. मागच्या वर्षी साधारण ५ ते ७ लाख लोकांनी या उत्सवाला भेट दिली.
    मुख्यतः ऑक्टोबर फेस्ट हा बियर फेस्टिवल आहे असं म्हणूयात. म्युनिच मधल्या ब्रुअरीज मध्ये बनलेली खास बियरच इथे सर्व्ह केली जाते. फक्त म्युनिच मधलीच बियर बरंका. दुसऱ्या कोणत्याच शहरातील नाही. फक्त ६ म्यूनिच ब्रुअरीजला - Augustiner, Hacker-Pschorr, Hofbräu, Löwenbräu, Paulaner, आणि Spaten - या उत्सवामध्ये बियर सर्व्ह करण्याची परवानगी आहे. १४ मोठे आणि अनेक लहान बियर टेन्ट्स आणि बियर गार्डन्स एकाच वेळी ९८००० पर्यटकांना सामावून घेतात. बियरच्या मगला "Maß" म्हणतात. साधारण एक लिटरचा मग ९ ते १० युरो दरम्यान पडतो. बियर मेड्स आणि वेटर्स एका वेळी १० बियरने भरलेले मग सर्व्ह करतात.
    ह्या फेस्ट दरम्यान सरासरी ६० लाख लिटर बिअर फस्त होते. २०१३ मध्ये साधारण ७७ लाख लिटर बिअर ह्या फेस्टमध्ये संपली होत असे विकिपिडीया सांगतोय. हा आकडा वाचून माझे तर डोळेच पांढरे झाले आणि खाण्यासाठी लागणाऱ्या गायी, बैल, डुकरे, मेंढ्या आणि कोंबड्यांची शिरगणती केली तर अक्षरशः भोवळ येईल. असो.
    ३१ हेक्टर वर पसरलेल्या मोठ्या मैदानावर (जे फक्त ह्या फेस्ट साठी आहे) वेगवेगळ्या फन राईड्स, बिअर कंपनीजचे मोठमोठे टेन्ट्स (ह्यात फक्त १८ वर्षांवरील लोकांना प्रवेश असतो), शेकडो खाण्याचे स्टॉल्स , वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स, मस्त सजलेला परिसर असतो. लहानपणी आनंदनगरीला गेल्याचं आठवतं मला पण ती खूपच छोट्या जागेत असायची. हा फेस्ट म्हणजे भव्यदिव्य आहे.
    ह्या उत्सवाची सुरुवात साधारण १६-१७ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता दिमाखदार मिरवणुकीने होते. त्यात मुख्यतः ब्रुअरीजचे ब्रासबँड पथके असतात. मिरवणूक एकदम शिस्तीत जाते. प्रत्येक ब्रुअरीचे मानाप्रमाणे मिरवणूकीत स्थान असते. सगळ्यात आधी त्याचं बॅनर त्यानंतर ब्रासबँड, मग येतो घोड्यांचा रथ ज्यामध्ये बिअरचे ड्रम्स असतात आणि त्यानंतर एका ट्र्कमध्ये त्या ब्रुअरीचे लोक. असा सगळा लवाजमा असतो.
   स्त्रिया "Drindle" ड्रेस आणि पुरुष "Lederhose" असा खास पारंपरिक बव्हेरिअन पोशाख परिधान करतात. म्यूनिचचे महापौर मिरवणुकीच्या प्रारंभी असतात आणि तेच पहिला बिअर ड्रमचा नळ उघडून ह्या उत्सवाचे उदघाटन करतात. आजूबाजूचे लोक "O'zapft is (It's tapped)" अशी घोषणा करतात आणि एका महाबियर उत्सवाला सुरुवात होते. प्रथम बियरचा मान बवेरियाच्या मंत्री अध्यक्षांना मिळतो.त्यानंतर फेस्ट सामान्य लोकांसाठी खुला होतो.
   तर असा हा फेस्ट याची देही याची डोळा बघता आला आणि कळलं की दारूचाही म्हणजे बियरचाही उत्सव आणि मिरवणूक वगैरे होऊ शकतो. कोणाचं काय तर कोणाचं काय. पुन्हा मी तेच म्हणेन की " जावे त्यांच्या देशा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!" हो ना?

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक           #munichdiaries

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

थांबला तो संपला

   मागील आठवड्यातील मुंबईची घटना वाचून मन विषण्ण झालं अगदी. त्या सगळ्या निरपराध लोकांची काहीही चूक नसताना त्याना हकनाक जीव गमवावा लागला. त्यांच्या आप्तस्वकीयांना ह्या दुःखाशी लढण्याचे बळ मिळो.  

   मुंबई!  ह्या शहराबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात सुप्त आकर्षण असतंच बहुतेक. म्हणूनच मायानगरी म्हणत असतील कदाचित. बॉलीवूड, क्रिकेट, स्टॉक मार्केट,लोकल,पाऊस,आणि अजुनही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे मुंबई सतत चर्चेत असते. लोकल वरून माझ्या आयुष्यातले दोन खूपच थरारक (माझ्यासाठी तरी) अनुभव आठवले. 


  मी ग्रॅजुएशनला असतानाची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये असताना आपण स्वतःला फारच पराक्रमी समजत असतो. ओव्हरकॉन्फिडन्स कशाशी खातात हेही चांगलच माहिती असतं. प्रत्येक गोष्टीत आपल्यालाच कसं कळतं आणि आपलंच कसं बरोबर आहे हेच वाटत असतं. पार आकाशाला गवसणी घालायची असते. हो ना! पण लग्न झाल्यावर आकाशाला गवसणी घालायला निघालेलं आपलं विमान बरोबर जमिनीवर येतं. 

   
   तर तेव्हा माझा दादा बोरिवलीला रहात होता. मी आणि आई माझ्या सुट्यांमध्ये पहिल्यांदाच मुंबईला गेलो. मुंबईमध्ये फिरायचं म्हटल्यावर लोकलमध्ये जाणं अनिवार्य आहे. दादा आणि वहिनी दोघेही जॉब करत असल्यामुळे मी आणि आईच सगळीकडे फिरत होतो. त्यादिवशी खरेदीला दादरला जायचा ठरवलं आम्ही. दादाने गर्दीच्या वेळा टाळून जा असं सांगून ठेवलं होतं. आम्ही दोघी दुपारी जेवण करून निघालो. तेव्हा फारशी गर्दी नव्हती लोकलला. दादरला शॉपिंग केलं आणि बरच फिरलो. त्यामुळे वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आणि जेव्हा परत जाण्यासाठी दादर स्टेशनला आलो तेव्हा तिथली गर्दी पाहुन घाबरायलाच झालं. गर्दीमुळे एक लोकल आम्ही सोडून दिली, पुढच्या लोकलमध्ये जाऊ असा विचार केला. पण कशाचं काय गर्दी तशीच.मग धीर करून पुढच्या लोकलमधल्या लेडीज डब्यात मी चढले. चढले म्हणजे गर्दीनेच मला चढवले. तशी मी दाराजवळच होते, मागे वळून पाहिलं तर आई दिसलीच नाही मला. एकदम पोटात गोळा आला, मला वाटलं आई चढताना पडली कि काय. गर्दीतून बाहेर डोकवायचा प्रयत्न केला तर बाहेरही आई कुठे दिसत नव्हती. एव्हाना लोकल हळुहळु निघत होती. लोकलने वेग घ्यायला सुरुवात केली आणि मी मागचापुढचा कोणताही विचार न करता बाहेर उडी मारली. लोकल वेग घेत असल्यामुळे मी जोरात प्लॅटफॉर्मवर पडले. आजुबाजूचे लोक धावत आले. आई पण तिथेच होती. तिला गर्दीमुळे चढताच आलं नव्हतं. खूप लागलं होतं पण आई सुरक्षित असल्याचं पाहुन बरं वाटलं. पण तिथले लोक खूपच रागवले मला. साहजिकच आहे, प्लॅटफॉर्मवर न पडता मी लोकलखाली गेले असते तर!! बापरे विचार करूनच जीवाचा थरकाप उडतो. नशीब बलवत्तर म्हणून ह्या मंदपणे केलेल्या चुकीतून वाचले मी. घरी गेल्यावर दादा वहिनीचे पण बोलणे खाल्ले. दादा म्हणाला उद्यापासून एकटीच फिर आता लोकलने म्हणजे जरा अक्कल येईल. नंतरही बरेच दिवस ह्या विषयावर सगळ्यांनी खूपच बोलुबोलू घेतलं मला. आणि मीही गपगुमान ऐकून घेतलं. 

  ह्या भयानक अनुभवाच्या २ वर्षानंतरची गोष्ट आहे. तेव्हा दादा US ला गेलेला होता. माझ्या एका मैत्रिणीची मावशी मुंबईत असते. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी जीवाची मुंबई करायला औरंगाबादहून प्रस्थान केलं. गर्दीच्या वेळा टाळूनच आम्ही फिरत होतो आणि बरोबर मैत्रिणीचे मावस भाऊ होते त्यामुळे फार त्रास झाला नाही कुठे. पण एकदा संध्याकाळी थोडा उशीरच झाला दादरला. तिथून आम्हाला विरार ट्रेन पकडायची होती. काय प्रचंड गर्दी असते त्या ट्रेनला. आधीच मला असलेल्या गर्दीच्या अनुभवाने मी थोडी घाबरलेलीच होते. मला लोकलमध्ये जायचीच इच्छा होत नव्हती पण दुसरा पर्यायही नव्हता. आम्ही सगळे ७-८ जणं होतो. एक ट्रेन आली. आम्ही सगळे आत जायचा प्रयत्न करत होतो. माझ्या मागच्या अनुभवामुळे मी भीत होते आणि त्यामुळे मी जरा मागे पडले तोवर सगळे आत गेले. मला जागाच मिळेना. त्यात आजुबाजूचे काही फालतू लोक गर्दीचा फायदा घेऊन गलिच्छ स्पर्श करत होते म्हणून मी थांबायचं ठरवलं. मला सोडून सगळेजण आत चढले आणि ट्रेन सुरु झाली. माझी एक जिवलग मैत्रीण लोकलच्या दाराजवळच होती आणि तिने मागे वळून पहिले. तिला मी प्लॅटफॉर्मवर एकटीच राहिले हे कळलं आणि लोकल वेग घेत असतानाच त्या पठ्ठीने कोणताही विचार न करता माझ्यासाठी लोकलमधून ऊडी मारली. माझा काळजात चर्रर्र झालं. खरंच आमच्या दोघींचं नशीब चांगलं म्हणून तीही प्लॅटफॉर्मवरच पडली. दुसरा विचार स्वप्नातही करू शकत नाही मी. तिलाही खूप लागलं. आजूबाजूचे लोक खूप रागवले आम्हाला. पण आम्ही मात्र एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होतो. काहीच सुचत नव्हतं. मी तिला म्हणाले अगं मी आले असते ग पुढच्या ट्रेननी. तर ती म्हणते तुला एकटी कशी सोडून जाऊ गं इथे. बाकी सगळे पुढे निघून गेलेले, तेव्हा काही मोबाइल पण नव्हता आमच्याकडे. आम्ही आपल्या बावळटसारख्या तिथेच थाम्बलो कारण काही सुचतच नव्हतं. मग मैत्रिणीचा मावसभाऊ पुढच्या स्टेशनला उतरून आम्हाला घ्यायला आला. त्याने शांतपणे आम्हाला लेडीज डब्यात चढवलं आणि आम्ही एकदाच्या घरी पोहोचलो. माझ्या मैत्रिणीचा पराक्रम ऐकून पुन्हा आम्ही खूप बोलणे खाल्ले. पण मैत्री खरंच काय असते ना! आयुष्य समृद्ध करणारी गोष्ट.


   मुंबईत राहून दोन गोष्टी चांगल्याच कळाल्या, एक म्हणजे  "थांबला तो संपला" आणि दुसरी आपल्या प्रिय गब्बरसिंगने सांगितलेली " जो डर गया समझो वो मर गया."


ता. क. : हे वाचून मुंबईचे लोक मला वेड्यात काढतील हे माहित असूनही लिहायचं धाडस केलं!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                   #mumbaidiaries


भोगा कर्माची फळं


   आज खूप दिवसांनी लख्ख सूर्यप्रकाश असावा. आपण विंडो शॉपिंगसाठी बाहेर पडावं. मूड एकदम छान असावा. ट्राम स्टॉपवर पोहोचल्यावर एकाच मिनिटात ट्राम यावी. गर्दीने भरलेल्या त्या ट्राम मध्ये फक्त माझ्यासाठी रिकामी ठेवल्यासारखी एक जागा दिसावी आणि आपण पटकन जाऊन तिथे बसावं. अहाहा!
     आणि इतक्या झकास मूड मध्ये आपलं लक्ष पायाशी जावं. बाजूला बसलेल्या काकूंच्या पायाशी बसलेल्या छोट्या श्वानाने आपल्याकडेच पाहावं. जन्मजात श्वान भयाने पछाडलेल्या किंवा मागच्या जन्मीचे श्वानभय असलेल्या माणसासारखी अवस्था होऊन आपण एका डोळयाने कुठे जागा दिसतेय का पहावे आणि एक डोळा श्वानावर ठेवावा. इतक्यात त्या श्वानाने तुम्हाला पदस्पर्श करावा. त्यामुळे अतीव भयाने आपण पटकन उभे राहावे. तरीही पुन्हा त्या श्वानाने पदस्पर्श करावा आणि जर्मनीमध्ये असल्याचा विसर पडून तुम्ही त्या श्वानाला "हाड" म्हणावे आणि श्वानाच्या काकूंनी मराठी कळत असल्यासारखं खाऊ की गिळू नजरेने आपल्याकडे पहावे.
    तेवढ्यात पुढच्या स्टॉपला एका रिकाम्या झालेल्या जागेत आपण शांतपणे स्थानापन्न व्हावे आणि छोटे श्वान आणि काकू पण त्याच स्टॉपला उतरून जाव्यात. हायसं वाटून समाधानाने तुम्ही डोळे मिटावेत. पण त्या छोट्या श्वानाला "हाड" म्हटल्याचे कर्मफळ तुम्हाला लगेच मिळावे ह्या हेतूने एक काका त्यांच्या तीनपट धिप्पाड श्वानाला घेऊन आपल्याच बाजूला येऊन बसावेत. आणि पुढचा पूर्ण प्रवास आपण जीव मुठीत धरून करावा.
    झकास मुडचा बट्टयाबोळ...कुचंबणा...प्रचंड कुचंबणा...

ता. क. : श्वानप्रेमींना दुखवण्याचा कोणताही हेतू वरील पोस्टमध्ये नाहीये.
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #munichdiaries

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

ऍमस्टरडॅम

    हॉलंड मधील ऍमस्टरडॅम हे पण युरोपच्या चारधाम मधील एक आहे असं म्हणणे अजिबात वावगं ठरणार नाही. कर्मधर्मसंयोगाने जर्मनी मध्ये आल्यामुळे युरोप मधील चारधाम करायचे असे आम्ही ठरवलं आहे. कारण पुन्हा येणं होईल न होईल. ऍमस्टरडॅमला जायचं तर ट्युलिप्सचा हंगाम बघूनच जाणं सगळ्यात योग्य. त्याविषयी पूर्ण माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. साधारण मार्च ते मे असा सिझन असतो ट्युलिप्सचा. ट्युलिप गार्डन पाहायला एक दिवस आणि विंडमिल्स पाहायला एक दिवस असा दोन दिवसांचा प्लॅन करून आम्ही रात्रीच्या ट्रेननी म्युनिचहुन ऍमस्टरडॅमला प्रयाण केलं.


    पण मी म्हणाल्याप्रमाणे कोणताही प्रवास अडचणींशिवाय पूर्ण झाला तर त्याला प्रवास म्हणताच नाही येणार माझ्या आयुष्यात. रात्रीच्या १० च्या ट्रेनने आम्ही सकाळी ९ वाजता ऍमस्टरडॅमला पोहोचणे अपेक्षित होते. साधारण ११ वाजता आम्ही आमच्या कोच मधे निवांत झोपलो. डोळ्यात ट्युलिप्सचे स्वप्न असताना पहाटे ५. ३० ला मला जाग आली. ट्रेन कोणत्या तरी स्टेशनला थांबलेली होती. मी तिथल्या कॉरिडॉर मध्ये येऊन खिडकीतून बाहेर पाहिलं कि कुठे स्टेशनचे नाव दिसते आहे का. आणि नाव वाचून धक्का बसला. ते होतं औसबुर्ग, म्युनिच पासून फक्त २ तासाच्या अंतरावर असलेलं एक गाव. आमची ट्रेन रात्री १ वाजेपासून त्याच स्टेशनला उभी होती आणि आम्ही घोडे विकून झोपलो होतो. काय तर म्हणे की ट्रॅक्सवर काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून अजून १ तास तरी ट्रेन निघणार नाहीये.

    मनात म्हटलं ये मेरे साथ हि क्यू होता है. म्हणजे आम्हाला पोहोचायला दुपार होणार. पुन्हा आत येऊन झोपायचा अयशस्वी प्रयत्न केला. आता पुढचे विचार यायला लागले. दुपारी पोहचून कसं आणि काय करायचं वगैरे वगैरे. शेवटी पुन्हा बाहेर कॉरिडॉर मध्ये आले. ट्रेन थोड्या वेळेपूर्वीच निघाली होती आणि बाहेर सूर्योदय होत होता. ट्रेन आत्ता एका नदीला समांतर प्रवास करत होती. मस्त डोंगर त्याच्या बाजूने वाहणारी स्वच्छ आणि नितळ नदी. नदीच्या काठावर असलेलं एक छोटं आणि सुबक युरोपिअन धाटणीचे घरं असलेलं गाव. आणि डोंगराच्या मागून वर येणारा सकाळचा केशरी सूर्य. अहाहा... वेळ तिथेच थांबावा असं वाटलं. मी किती वेळ हे सगळं न्याहळत होते मला पत्ताच लागला नाही.

     "आई किती वेळ लागेल अजून ऍमस्टरडॅमला पोहोचायला?", "बाबा आलं कारे ऍमस्टरडॅम?", मला मॅप दाखव अजून किती स्टेशन्स ते?" हे आणि असेच इतर वाक्यांचे पारायण ऐकत ऐकत आमचा प्रवास चालू होता. ट्रेन नाईटलायनर असल्यामुळे त्यात खानपान सुविधा नव्हती. सकाळी चहा न पिल्यामुळे सकाळ झालीय असं आम्हा दोघांनाही पटतच नव्हतं. जवळ असलेले स्नॅक्स खाऊन लेक वैतागला. नवऱ्याला चांगलं म्हणाले होते कि धपाटे घेते थोडे बरोबर तर म्हणतो कसा "तुझ्या त्या धपाट्यांचा वास अक्ख्या ट्रेनला येईल आणि लोक तुटून पडतील त्यांच्यावर.. अजिबात घ्यायचे नाही." किती तो उपरोधिकपणा. खरंतर दशम्या आणि धपाटे प्रवासात घेऊन जाण्याची किती मोठी परंपरा आहे मराठी माणसाची! पण परंपरेला छेद न देईल तो मराठी माणूस कुठला? असो.

    शेवटी आम्ही दुपारी १ वाजता ऍमस्टरडॅमच्या भूमीवर पाय ठेवले. दीड दिवसाच्या प्रवासाने अंग आंबले होते. म्हणून हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन फिरण्याचा निर्णय घेतला. इथला लोकल ट्रान्सपोर्ट पॅरिस सारखा भुलभुलैय्या नसला तरी म्युनिचच्या लोकल ट्रान्स्पोर्टच्या थोडाही जवळ जाणारा नाहीये याची प्रचिती आली. पुन्हा नकाशा पाहून हॉटेलसाठी कोणती ट्राम पकडायची, येताना कसं यायचं, विंडमिल्स साठीची बस कुठून आहे इत्यादी चौकशा करूनच हॉटेलवर गेलो. ह्या सगळ्या घोळात २-३ तास गेलेच.
     विंडमिल्सला जाणे येणे जरा वेळखाऊ होते आणि आधीच आमचा अर्ध्याच्या वर दिवस वाया गेला होता म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला आणि सिटी टूर घेतला. ऍमस्टरडॅम व्हेनिस सारखे पूर्णपणे पाण्यावर नसले तरी ७०% पाण्यावर आहे. इथेही कॅनाल्स आहेत. आणि आम्ही त्यातूनच बोट टूर घेतली. शहरातील महत्वाची ठिकाणे बघत बघत मस्तपैकी बोटीच्या चालकाचे जर्मन आणि इंग्लिश माहितीपर भाषण ऐकत आम्ही "ऍन फ्रॅंक" च्या घराजवळ पोहोचलो. ते बघायची माझी खुप इच्छा होती पण तिथली तिकिटासाठीची रांग बघून लेक म्हणाला " आई प्लिज.. मी नाही येणार... तुम्ही दोघे जा." आता काय बोलणार मी. दिला विचार सोडून.

     सिटी सेन्टरला येऊन तिथून फेरी बोटीतून प्रवास केला. दुसऱ्या किनाऱ्यावर असलेले अमेझिंग सायन्स अँड फिल्म मुजिअम पहिले. लेक सगळ्यात जास्त इथे रमला. तिथेच बाहेर "I am Amsterdam" च्या जवळ फोटो काढले. इथे फोटो नाही काढले तर लोक तुम्हाला वाळीत टाकू शकतात कि ऍमस्टरडॅमला जाऊन इथे फोटो काढले नाहीत म्हणून. त्यामुळे आम्ही शिरस्ता मोडला नाही. एव्हाना पोटात कावळे कोकलायला लागले होते. आणि आमचे हे त्या " सरवण भुवन (युरोपमधील दक्षिण भारतीय रेस्टॉरंटची चेन )" च्या प्रेमात असल्यासारखे नकाशावर त्याचा रस्ता शोधात होते.

     नेहमीप्रमाणे लेकाची सहनशक्ती संपली होती, त्याला भयंकर भूक लागली होती आणि तो वैतागला होता. मुलांची सहनशक्ती नेहमीच आपल्या सहनशक्तीच्या व्यस्त प्रमाणात असते. त्यामुळे सरवण भुवनचा नाद सोडून आम्ही जवळच्या उत्तर भारतीय रेस्टारंटचा आधार घेतला. तिथली दाल माखनी खाऊन आणि तिथल्या सरदार काकांशी हिंदीमध्ये गप्पा मारून मन अगदी तृप्त झालं. त्यांनी लेकाला तर आग्रह करून जेऊ घातलं. ट्युलिप्सच्या स्वप्नामध्ये रात्र सरली.

    सकाळी लवकर उठून ट्युलिप गार्डन ची तिकिटे मिळण्याचं जवळचं ठिकाण शोधून तिथे निघालो. तिकिटे मिळाली पटकन. मला वाटलं आता बस मध्ये बसायचं आणि अर्ध्या तासात गार्डन. इतकं मनासारखं होत असतं का कधी? नाहीच मुळी. बस साठी आम्ही रांगेत उभे राहिलो. ती रांग पाहून लहानपणी पंढरपूरला गेल्याचं आठवलं मला. माझ्या आई वडीलांची काय परिस्थिती झाली असेल पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या रांगेत माझ्यामुळे ह्याची पुरेपूर कल्पना आली त्या रांगेत मला. लेकाने जीव नकोसा केला अक्षरशः."जगातले मधले सगळे लोक आजच आले आहेत का ऍमस्टरडॅमला? आपण आजच जाणार ना म्युनिचला?, त्या गार्डन मध्ये खेळता येईल का? तुला नुसते फुलं बघण्यात काय इंटरेस्ट आहे एवढा? तिथून लगेच निघणार आहेस ना? "... वगैरे वगैरे... डिजनीलँडला जायला तो जितका खुश होता त्याच्या अगदी उलट परिस्थिती.

    २ तासांनी कशीबशी एका बस मध्ये जागा मिळाली आम्हाला. आता वाटलं झालं जाऊच पटकन ट्युलिप गार्डनला. पण नाही. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे, अर्ध्या तासाचं अंतर २ तासात कापत आमची बस ट्युलिप गार्डनला पोहोचली एकदाची. तर प्रचंड मोठ्या लोकसंख्येने आमचं स्वागत केलं तिथे. खरंच वाटलं कि जगातले सगळे लोक आजच आले आहेत का इथे?

    ३२ हेक्टर वर पसरलेले कोकेनहॉफ ट्युलिप गार्डन, ७० लाखाच्या आसपास फुले आणि एकूण ८०० टूलिपचे प्रकार इथे वसंत ऋतू मध्ये बघायला मिळतात. खरंच अद्वितीय! एका दिवसात एवढं बघणं शक्य होतच नाही खरंतर. पृथ्वीवर स्वर्ग अवतरतो तिथे. इतके सुंदर ट्युलिप्स आणि वेगवेगळी फुले मी पहिल्यांदाच पहिली. मन हरखून गेलं एकदम. नजर जाईल तिथे ट्युलिप्स. मन फुलपाखराप्रमाणे वेगवेगळ्या फुलांच्या ताटव्यांवर फिरत होतं. किती थोडं बघून झालय आणि कितीतरी बघायचं राहिलय असंच वाटत राहिलं मला. हजारो ट्युलिप्स कॅमेरामधे आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त मनामधे साठवले. संध्याकाळचे ५.३० वाजत आले होते. हवेतला गारवा वाढायला लागला. तरी हवामानाने कृपाच केली म्हणायची. दिवसभर सूर्यप्रकाश होता लख्ख. एव्हाना लेक कंटाळून गेला होता. जड अंतःकरणाने मी ट्युलिप गार्डनचा निरोप घेतला.

    पुन्हा वाहतूक कोंडीमुळे स्टेशनला पोहोचायला जरा उशीरच झाला. आम्ही आणि आमच्या सोबत अजून एक भारतीय कुटुम्ब यांची पळणारी वरात स्टेशनवरुन निघाली होती कारण ट्रेन निघायला फक्त ५ मिनिट बाकी होते आणि आम्हाला २ फ्लॅटफॉर्म्स ओलांडून जायचे होते. दुसऱ्या कुटुंबातील साठीच्या काकूंनी जिद्द व इच्छाशक्तीचे अतुलनीय प्रदर्शन करत त्यांचा अवाढव्य देह घेऊन ट्रेन पकडली. हि ट्रेन कोणताही उशीर न करता म्युनिचला पोहोचली.

एक अविस्मरणीय आणि रंगीबेरंगी आठवणींचे मोरपीस मी मनाच्या पुस्तकात ठेवलं!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #amsterdamdiaries




















वाचकांना आवडलेले काही