शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

निर्णय

  एखाद्या माणसाच्या आयुष्यात कधीकधी खुप निर्णायक क्षण येतात जिथे त्याच्या समोर दोन पर्याय असतात आणि त्यातला एक निवडणं त्या क्षणी अत्यंत महत्वाचं असतं. अगदी जीवन मरणाचा प्रश्नच म्हणू या ना, त्या माणसासाठी तरी अशीच परिस्थिती असते त्या वेळी. तो, ज्याने त्या निर्णायक क्षणापर्यंत खुप कष्ट घेतलेले असतात, त्या एका गोष्टीसाठी वाट पाहिलेली असते. आणि एका हताश वेळी, ती गोष्ट त्याच्यासमोर येते पण अजून एक पर्याय घेऊन, जिथुन पुढे त्याला दोन रस्ते दिसत असतात. रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. पण तरीही एक पर्याय निवडणं ही त्या क्षणाची फार मोठी परीक्षा असते. तशा या परीक्षा थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात आणि स्वतःच्या परीने माणुस ती परीक्षा पास अथवा नापास होत असतो.

 तर, त्याच्याही आयुष्यात ही परीक्षेची वेळ आली. तो, एक उच्चशिक्षित मध्यमवर्गीय तरुण, ज्याला आईवडिलांनी खूप कष्टाने शिकवलं पण नोकरी मिळवण्यासाठी त्याला फार कष्ट पडले आणि त्याच दरम्यान तो निर्णायक क्षण त्याच्या आयुष्यात आला. नोकरी मिळत नसल्याने खूपच हताश झाला होता तो, तेव्हाच वडिलांच्या एका स्नेह्यांनी त्याच्या गावी एका कंपनीमध्ये त्याच्यासाठी शब्द टाकला. २ दिवसांनी त्या कंपनीमध्ये त्याची मुलाखत ठरली. त्या वेळी तो पुण्यात एका कोर्ससाठी रहात होता. कोर्स पूर्ण करुन नोकरीसाठी अर्ज करणे चालुच होतं त्याचं पण कुठूनही प्रतिसाद येत नव्हता. तेवढ्यात त्याला वडिलांनी गावी ये म्हणून सांगितलं.

  त्याला वाटलं आलेली संधी सोडू नये म्हणून तो लगेच गावी जायला निघाला तरी त्याच्या मनात रुखरुख होतीच की ज्या क्षेत्रात पाहिजे तिथला जॉब नाहीये हा पण वडिलांच्या शब्दाखातर त्याने गावाला जाण्याची बस पकडली. बस मध्ये त्याच्या डोक्यात निरनिराळे विचार पिंगा घालत होते तेवढ्यात त्याला पुण्यातील कोर्स केलेल्या इन्स्टिट्युट मधुन फोन आला कि २ दिवसांनी सकाळी १० वाजता अशाअशा कंपनीत तुमची मुलाखत आहे वेळेवर हजर रहा. दोन्ही मुलाखती एकाच वेळेला पण दोन वेगवेगळ्या गावांना आणि दोन वेगवेगळ्या क्षेत्रात.

 हाच तो खूप मोठी परीक्षा पहाणारा क्षण! मनाची खुप घालमेल, एकीकडे वडिलांनी दिलेला शब्द तर दुसरीकडे मनाजोगतं क्षेत्र. पण तरीही दोन्हीही ठिकाणी यश त्यालाच खेचून आणावं लागणार होतं. पण त्याचा हा निर्णय त्याच्या आयुष्यावर दुरगामी परिणाम करणार होता. गावी जाऊन आई वडिलांशी शांतपणे चर्चा करून त्याने शेवटी पुण्याच्या कम्पनीची मुलाखत द्यायचा निर्णय घेतला आणि लगेच २ तासांनी तो पुण्याला रवानाही झाला.

 मुलाखत यशस्वी ठरली आणि ती नोकरी त्याला मिळाली. खरंतर ती एक छोटी कम्पनी होती आणि पगारही मनाजोगता नव्हता. पण त्या कामाच्या अनुभवावर पुढे थोड्याच दिवसात एका मल्टिनॅशनल कंपनीत त्याला मस्त जॉब मिळाला आणि त्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे!

 आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर असे निर्णय घ्यायची वेळ येते आणि समोर दोन पर्याय असतात. पण असे निर्णय सगळ्यांचेच बरोबर ठरतात का हो? त्यावेळी निवडलेला रस्ता चुकला तर? ज्यांची ह्या प्रश्नांची उत्तरं "नाही" अशी आहेत त्या लोकांना होणाऱ्या यातना फार भयंकर असतात. पुन्हा कधी ते त्या चुकलेल्या निर्णयातुन सावरू शकत नाहीत असं मला वाटतं! त्याच चुकलेल्या निर्णयाने आयुष्याची वाताहत केली तर त्याने निवडलेल्या पर्यायलाच "नशीब" असं म्हणत असतील का?


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                     #nirnay     
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही