रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

चिठ्ठी आई है

त्यादिवशी लेकाला शाळेतून आणायला निघाले होते आणि दार उघडलं तर खाली एक चिठ्ठी दिसली. FB आणि WA चा जमान्यात दारात चिठ्ठी म्हणजे एकतर कोणाला तरी तुमच्याविषयी खरंच फार मोठा प्रॉब्लेम आहे किंवा कोणाला तरी तुम्हाला फारच मोठं सरप्राईज द्यायचं आहे, एवढे दोनच अर्थ असू शकतात असं मला वाटतं. वाढदिवस असल्यामुळे प्रॉब्लेमचा विचार मनाला शिवलाच नाही. एकदम भारी वाटायला लागलं. म्हटलं नवऱ्याने सकाळीच ऑफिसला जाताना चक्क सरप्राईज ठेवलं होतं दारात आणि मी आत्ता पाहतेय. वाटलं बिचाऱ्याने लंच वगैरे प्लॅन केलं असेल तर? किंवा काहीतरी छानसं लिहिलेलं असेल पत्रात.


मनमोराचा पिसारा अतीच फुलवून मी चिठ्ठी उघडली आणि मॅगी काकूंची सही पाहून मनमोराच्या पिसाऱ्यातले पिसं टपटप पडून गेले. "अब मैने क्या गुनाह किया भगवान जिसकी सजा मुझे मेरे जनमदिन पर भुगतनी पड रही है?" ह्या टाईपचे तद्दन फिल्मी विचार करत मी चिठ्ठी वाचत होते. तर विषय पुन्हा तोच कि त्यांना रात्री काहीतरी विचित्र आवाजाने जाग आली, तुमच्या घरातील दारे चेक करा आणि बिजागऱ्यांना तेलाची गरज आहे इत्यादी. पटकन घरात येऊन २ मिनिटात सगळी दारं चेक केली आणि जीव भांड्यात पडला. एकही दार वाजत नव्हतं. चला म्हटलं यावेळी संक्रात बिल्डिंग मधल्या दुसऱ्या कुणावर तरी आहे .


घरी आल्यावर काकूंच दार वाजवलं म्हटलं सरळ त्यांना सांगावं की तुम्ही मागच्या वेळी सांगितल्यापासून पंचप्राण दारावर केंद्रीत असतात माझे. पण काकू घरात असूनही दार उघडेनात. मग मीही मनाचा हिय्या करून त्यांना चिठ्ठी लिहिली कि आमचं एकही दार वाजत नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही चेक करू शकता. तुमचं आमच्या घरात स्वागत आहे वगैरे वगैरे. आणि चिठ्ठी त्याच्या दाराला लावून दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खालच्या नोटीसबोर्डवर नोटीस होती की "ज्यांच्या कोणाच्या घरातून असे विचित्र आवाज येत असतील त्यांनी तात्काळ त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल."


दुसरीकडे मोठा अपेक्षाभंग झाल्याचं प्रचंड वाईट वाटत होतं की ती चिठ्ठी नवऱ्याने ठेवली नाहीये. खरंतर मागच्या १०-११ वर्षात एकमेकांना फक्त संसारीकच मेसेजेस केले. म्हणजे मी - आज येताना अमुकतमुक आण, तो - आज रात्री यायला उशीर होईल, मिटिंग आहे, मी - अरे ते अमुक तमुक बिल भर ना रे, तो - जेवायला अमुकतमुक आहे का? इत्यादी.



    पण खरंच असं एखादं छानसं पत्र वाढदिवसाला हातात पडलं तर कित्ती मस्त वाटेल! अगदी कोणत्याही जवळच्या माणसाने लिहिलेले. सगळ्यात सुंदर गिफ्ट असेल ते! पूर्वी कसं लोक पोस्टमनच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असायचे. कोणाला नोकरी लागल्याचे पत्र, कोणा विरहिणीला आलेले प्रेमळ पत्र, कोणा आईबाबांना सासुरवाशीण लेकीचे पत्र किंवा दूरवर नोकरीला असलेल्या लेकाचे पत्र, कोणा लेकीला आईबाबांचे पत्र. किती आनंद देऊन जात असतील ते चार शब्द! असो.



     इथे आल्यापासून पत्राचा धसकाच घेतलाय पण मी. इथल्या बऱ्याच गोष्टी अजूनही पत्रव्यवहारावर चालतात. म्हणजे बँकेला किंवा कोणत्याही शासकीय ऑफिसला काही गोष्टींसाठी फक्त पत्र टाकावे लागते. इमेल, इंटरनेटच्या जमान्यात पत्र! मला आलेले ते दोन पत्र म्हणजे इजा आणि बिजा अनुभव आहेत. आता तिजा अनुभव काय असेल देव जाणे?



    तर अनुभव इजा - इथे एक फंडा आहे रेडिओ चार्जेस नावाचा. तुम्ही रेडिओ ऐका अथवा नका ऐकू, तुम्हाला ते चार्जेस भरावेच लागतात. प्रत्येक घरासाठी हे चार्जेस असतात. मी इथे आल्यावर मला त्यांचे पत्र आले कि असे चार्जेस तुम्ही भरा. नवरा आधीच हे चार्जेस भरत असल्यामुळे मी त्या पत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्याबद्दलची माहितीही नवऱ्याला दिली नाही (त्यासाठी बोलणे खाल्ले ते वेगळेच). ७-८ महिन्यांनी अजून एक पत्र माझा नावावर आलं. त्यातला मजकूर वाचून धक्काच बसला. ती कायदेशीर नोटीस होती आणि त्यात लिहिलं होतं की तुम्हाला पत्र पाठवूनही तुम्ही रेडिओ चार्जेस भरले नाहीयेत त्यामुळे कोर्टात हजर राहा. पुन्हा तेच "ये मेरे साथही क्यु होता है?" भयंकर टेन्शन आलं होतं. मला वाटलं आता किती दंड भरावा लागतो काय माहित. दिलेल्या तारखेला प्रचंड थंडीत आम्ही सगळे कागदपत्र घेऊन त्या कार्यालयात गेलो. तर तिथला वकील कुल होता, म्हणाला "हे नेहमीचंच आहे ह्या लोकांचं, व्यवस्थित रेकॉर्ड ठेवत नाहीत आणि लोकांना नोटीस पाठवत बसतात". मनात म्हटलं "मंडळ आपलं आभारी आहे". शांत मनाने घरी आले.



    अनुभव बिजा - आपण शांतपणे आपलं आयुष्य जगत असतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांवर येणारी संकटं म्हणजे चहाच्या पेल्यातील वादळंच असतात खरंतर, पण जेव्हा अशी संकटं येतात तेव्हा पार वाट लागते. नवऱ्याला एका महत्वाच्या कामासाठी एक आठवडा भारतात जावं लागणार होतं. त्याची निघायची तयारी चालू होती. आम्ही उगीचच एकमेकांना चिडवत होतो की बरं आहे आठ दिवस तरी शांतता आता, तू तिथे शांत राहा मी इथे वगैरे वगैरे. त्याचा निघायचा दिवस उजाडला. त्याला मेट्रो स्टेशनला सोडून मी घरी आले. त्याने पण फ्लाईट बोर्ड केल्यावर फोन केला.



    मी आपलं नेहमीप्रमाणे लेकाला घेऊन येताना पोस्टबॉक्स चेक केला तर पुन्हा माझा नावावर एक पत्र. धस्सच झालं मला. घरात जाऊन पत्र फोडलं आणि पायाखालची जमीनच सरकली. मेडिकल इन्शुरन्स वाल्यांचे पत्र होते आणि लिहले होते की "-- ह्या तारखेपासूनचे तुमचे बिल "अमुकतमुक" युरो आहे आणि ते पुढील आठ दिवसात तुम्हाला भरावे लागतील. न भरल्यास दंडाच्या रकमेसहीत "अमुकतमुक" युरो भरावे लागतील." "अमुकतमुक" युरो अजून बँक अकाउंटला सुद्धा कधीच न बघितलेली मी. बेशुद्ध होण्याचंच बाकी राहिलं होतं फक्त. काहीच सुधरेना. कस आणि काय करावं. कारण नवऱ्याला यायला अजून एक आठवडा होता. WA कॉल केला, मला वाटलं तो कनेक्टिंग एअरपोर्टला पोहोचला असेल पण कॉल लागेल तर शपथ. शेवटी त्याला इमेल आणि मेसेजेस केले. बिचारा नवरा, एअरपोर्टला उतरल्यावर माझे मेसेजेस आणि मेल बघून तोही जरा घाबरला.



   रोज सकाळी उठून आज काय वाढुन ठेवलंय अजून असं चाललं होतं. त्यात नेमकी नवऱ्याच्या ऑफिस मधली HR वाली गावाला गेलेली. त्या इन्शुरन्स वाल्यांचे दर एक दिवसाआड नवीन पत्र येत होतं. पाहिलं पत्र बिल भरा. दुसरं पत्र बिलासोबत दंड भरा. तिसरं पत्र तर मी उघडणारच नव्हते पण नवरा आर्जवं करत होत कि बाई उघड आणि बघ काय ते आणि मला कळव. त्यात नविन कार्ड पाठवलं होतं त्यांनी. एकीकडे दण्ड भरा म्हणत होते आणि दुसरीकडे नवीन कार्ड पाठवत होते. मंद लोक कुठचे. वैताग नुसता. एकंदर ते आठ दिवस फोनवर प्रचंड मनःस्ताप, बरेच इमेल, कॉल्स, ऑफिसच्या लोकांशी संपर्क वगैरे करून प्रकरणावर पडदा पडला.



    खरंतर फॅमिली इन्शुरन्स असल्यामुळे मला एकटीला असं काही पत्र येईल हि अपेक्षाच नव्हती. पण इन्शुरन्स कम्पनीचे रेकॉर्डस् अपडेटेड नसल्याचा फालतू फटका आम्हाला बसला. सरतेशेवटी मेडिकल इन्शुरन्स वाल्यांचे पत्र आले की झाल्या गोष्टीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. डोंबल माझं. जीव काढला त्या पत्राने अक्षरशः.



आता जर माझ्या नावावर एखादं पत्र आलं तर मी सुषमा स्वराज ह्यांनाच कळवावे म्हणते. त्या खूप मदत करतात म्हणे!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                        #rajashrismunichdiaries

२ टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही