शुक्रवार, २६ जून, २०२०

आँखोकी गुस्ताखीयां

आज डोळ्यांच्या दवाखान्यात जाण्याचा योग्य आला. चाळीशी आलीये असं माझ्या डोळ्यांनी मला ठणकावून सांगितल्यावरच मी अपॉइंटमेंट घ्यायला फोन केला. तर रिस्पेशन ताई म्हणाली दोन महिन्यानंतरची अपॉइंटमेंट आहे. दुखणाऱ्या डोळ्यांकडे पाहून म्हणजे दुखणाऱ्या डोळ्यांचा विचार करून रिस्पेशन ताईला म्हंटलं "जरा आधीची दे ना ग अपॉइंटमेंट" तर म्हणे दीड महिन्यानंतरची आहे, यायचं तर या नाहीतर राहूद्या. इथे असंच आहे. तुम्ही मरायला टेकला असाल तर इमर्जन्सी क्लीनिकला जायचं नाहीतर तारीख पे तारीख चालूच राहणार. एखाद्या दिवशी, एखाद्या दवाखान्यात, एखाद्या टेबलवर सनी पाजी सारखं जोरदार हात मारुन मी म्हणणारच आहे हा डायलॉग. 

मागचा दीड महिना डोळ्यांनी जो असहकार पुकारला तो वाखाणण्याजोगा आहे. टीव्ही म्हणू नका, पुस्तक म्हणू नका, फोनवर फेसबुक, व्हॅट्सऍप म्हणू नका.. काही म्हणजे काही वाचू किंवा बघू देणार नाहीये आम्ही तुला, असंच काहीसं चालू होतं. एक मन वाटलं की तोपर्यंत एखाद्या ऑप्टिशियनकडे जाऊन एखादा चष्मा घेऊन येऊ पण इथल्या ऑप्टिशियन लोकांची तीन चार पानी प्रश्नपत्रिका लगेचच दुखणाऱ्या डोळ्यांसमोर आली आणि मी माझा मनसुबा बदलला. त्या प्रश्नपत्रिकेतली उत्तरं लिहून अजून "आँखोंकी रोशनी वगैरे चली जायेगी" म्हंटलं. कसाबसा दीड महिना काढला. पण चष्म्याचे सोपस्कार आठवून अजून १ दोन महिने कसे काढणार हा यक्ष प्रश्न पडला आहे. 

तर ह्या सगळ्यांत एक BC किस्सा आठवला. BC म्हणजे before corona.. 

साधारण मागच्या नोव्हेंबरची गोष्ट आहे. त्या काळात म्युनिकमध्ये वेगवेगळे रोग मुक्काम ठोकून असतात. त्यातलाच एक म्हणजे सायनसचे इन्फेक्शन. थंडी सुरु होत असते, सुर्प्रकाश कमी होऊन दिवस लहान होत असतो. फार भयानक वातावरण असते. मला जबरदस्त सायनसचे इन्फेक्शन झाले होते पण चिरंजीवांची  डोळ्याच्या दवाखान्यात अपॉइंटमेंट होती. ती चुकली तर पुन्हा एक दोन महिने अपॉइंटमेंट मिळायची मारामार, म्हणून मला खूप त्रास होत असताना त्याला घेऊन गेले. 

मला आधी वाटलं माझे डोळेच आले आहेत. कारण डाव्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं म्हणून रीतसर गॉगल वगैरे लावून मी गेले लेकाला घेऊन. वाटलं चला आपण डोळ्यांच्या दवाखान्यातच जातोय तर लगे आँखो म्हणजे लगे हाथो आपला डोळाही दाखवून घेऊ. भाबडी भारतीय विचारसरणी आपली. तिथे गेल्यावर रिस्पेशन ताईला म्हणाले कि मला पण डॉक्टरला डोळा दाखवायचा आहे, मी लेकासोबतच दाखवला तर चालेल का? 

माझ्या चेहऱ्याकडे डोळेही वर करुन न बघता "नाही" म्हणाली ना ती! मी तिला विनंती केली, म्हणाले " मला खुप त्रास होतोय, सहन होत नाहीये, कृपया मला दाखवु द्या हो." ताई तिच्या मतावर ठाम होती. "नाही म्हणजे नाही". बिना अपॉइंटमेंटचे त्यांच्या जीझसचे पण डोळे तपासणार नाहीत बहुतेक ते. ते आपण नाही म्हणत का स्वर्गातून ब्रह्मदेव जरी आला तरी तसं. 

मी :मला आत्ताचीच अपॉइंटमेंट दे. 
ताई: २ महिन्यानंतरची आहे. 
मी: पण माझा आत्ता डोळा दुखतोय, मैं कहाँ जाऊं? 
ताई: तो मैं क्या करू?

तोवर माझ्या डोळ्याने माझी पार वाट लावली होती. एकतर पाच सहा सिनियर सिटिझन्स आमच्या आधी पासून तिथे बसलेले होते. लेक "मेरा नम्बर कब आयेगा?" म्हणून ताप देत होता. त्यात हि ताई माझं ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी मी तिला विचारलं... 
"इमर्जन्सी क्लीनिकला जाऊ का? मला त्रास सहन होत नाहीये." ह्यावर ताईने जे भन्नाट उत्तर दिलं ते ह्याची देही ह्याची डोळा ऐकून आणि बघुन मला शब्दच सुचले नाहीत. ताईने अगदी साभिनय डोळा हातात पडतोय असं दाखवून मला म्हणाली "तुझा डोळा जर तुझ्या हातात आला असेल तरच तू इमर्जन्सीला जाऊ शकते. नाहीतर तिथेही तुला कोणी घेणार नाही." मी आवक होऊन, गपगुमान वेटिंग एरिया मध्ये येऊन बसले. तर लेक म्हणतो "बघ मी तुला आधीच सांगत असतो तू असे उद्योग करत जाऊ नकोस. इथे अपॉइंटमेंट शिवाय नाही दाखवता येत."

ये सब सुनके, मला जो धक्का बसला तो माझ्या डोळ्याने फारच मनावर घेतला. डोळ्याला वाटलं असेल "हि बाई आता आपल्याला हातात घेईल आणि जाईल इमर्जन्सी क्लिनिकला. उगी कुठे रिस्क घ्या. मी आपला असाच बरा  होतो." त्या दवाखान्यात लेकाचा नम्बर येईपर्यंत, पाणी गाळून गाळून डावा डोळा एकदम राईट झाला ना! 

या चमत्कारामुळे आता मनात येतंय कि त्या डोळ्यांच्या दवाखान्यातच एखादी नोकरी मिळते का बघावी म्हणजे अशी "आँखोंकी गुस्ताखीयां माफ हो जायेगी. क्यों?"


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

शुक्रवार, १२ जून, २०२०

हे घरची माझे विश्व

#जर्मनीतील_लॉकडाऊन_अनुभव 

आम्ही जर्मनीतल्या म्युनिकमध्ये मागील पाच वर्षांपासून राहतो. ह्या पाच वर्षात एकही दिवस असा नाही गेला की आम्ही घराबाहेर पडलो नाही. इथे कोणत्याही प्रकारची घरगुती मदत म्हणजेच आपल्याकडे असतात तसे दुधवाला, पेपरवाला, घरातील मदतनीस बायका आणि तत्सम मदत मिळत नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतः करावी लागते. त्यामुळे दूध आणायच्या निमित्ताने का होईना बाहेर चक्कर होतेच. पण १८ मार्चला जर्मनीमध्ये लॉकडाऊन सुरु झालं आणि बाहेर पडणं एकदमच कमी झालं. अक्षरशः "हे घरची माझे विश्व झालं". थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती माझ्यासारख्या बऱ्याचश्या लोकांची झाली आहे. हो ना?

ह्या सगळ्याची सुरुवात जर्मनीमध्ये म्यूनिकजवळच्या स्ट्रानबर्ग नावाच्या छोट्या शहरात जानेवारीमध्ये झाली. तिथल्या एका छोट्या कंपनीत एक चिनी व्यावसायिक काही कामासाठी आली होती आणि तिच्यामुळे त्या कंपनीतील बऱ्याच कर्मचाऱ्यांना ह्या कोरोना विषाणूची लागण झाली होती. तेव्हा इथल्या शासकीय यंत्रणेने तत्परतेने पावलं उचलत हा संसर्गजन्य आजार अजिबात पसरू दिला नव्हता. पण, फेब्रुवारीमध्ये इथे कार्निव्हलनिमित्त एक आठवडा सुट्या होत्या. त्यात जर्मन लोक प्रचंड प्रवास करतात, त्यांना फिरायची फार आवड आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्कीईंग ह्या लोकांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ह्या कार्निव्हलच्या सुट्टीत बरेच लोक प्रवासाला आणि स्किईंगला ऑस्ट्रिया, इटली मध्ये गेले आणि तिथून हा विषाणु पुन्हा जर्मनीमध्ये घेऊन आले आणि तो इथे पुन्हा पसरायला सुरुवात झाली. तेव्हा युरोपमध्ये इटलीत ह्या विषाणूने घातलेले थैमान बघता जर्मन सरकारनी कडक पावलं उचलायचा निर्णय घेतला कारण इथे मोठ्या प्रमाणावर असेलेले वृद्धआणि १८ मार्चला इथे टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन जाहीर झाले. लॉकडाऊन जाहीर झाल्या झाल्या इथेही काही प्रमाणात पॅनिक बायिंग झालेच. सॅनिटायझर,हँडवॉशचा आणि काही प्रमाणात दूध, फळ, भाज्या तुटवडा निर्माण झालाच. परंतु इथल्या प्रशासनाने लगेचच सुपरमार्केट्सची वेळ वाढवली आणि लोकांना आवाहन केले की "कोणत्याही वस्तूचा तुटवडा भासणार नाही." त्यामुळे काही अंशी पॅनिक बाईन्गला आळा बसला

नवरा संगणक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्याचे घरून काम सुरु झाले आणि मुलाच्या शाळेतून इमेल आला की आम्ही लवकरच ऑनलाईन शाळा सुरु करू. मी जानेवारीपासून बातम्यांमधून ह्या विषाणूचा मागोवा घेत होते आणि जर्मनीमध्ये जेव्हा लॉकडाऊन जाहीर केलं तेव्हा जरा दहशतीतच होते. नाही म्हटलं तरी पूर्ण युरोपमधल्या बातम्या घाबरवणाऱ्याच होत्या आणि जर्मनीतले झपाट्याने वाढणारे आकडे पाहून मनावर ताण आलाच. नवऱ्याला साधं सामान आणायला पाठवायला जीवावर येत होतं. पण दूध आणणं तर गरजेचंच होत. त्यामुळे आठवड्यातून एकदाच तो किंवा मी बाहेर पडून लागेल तसं सामान आणायला सुरुवात केली. अजूनही आम्ही हेच तत्व पाळतोय

युरोपच्या बातम्या ऐकून भारतात घरचे सगळेच काळजी करत होते पण आम्ही इथली परिस्थिती पाहून त्यांना वेळोवेळी धीर देत होतो. आम्ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट केली ती म्हणजे घरच्यांना सांगितलं की कोणत्याही फॉरवर्ड मेसेजवर किंवा गंभीर बातमीवर लगेच विश्वास ठेऊ नका, आधी आम्हाला फोन करा. कारण काही लोकांनी उगीचच चुकीची माहिती पसरवली होती सुरुवातीला

पहिले पंधरा दिवस आम्ही फक्त आमच्या इमारतीच्या आवारात संध्याकाळी थोडावेळ चक्कर मारत होतो. आमच्या इमारतीच्या खाली फार सुंदर पायवाट आहे, वेगवेगळी झाडे आहेत, छोटीशी बाग पण आहे. त्यात नेमकाच वसंत सुरु झालेला होता, झाडांना नवीन पालवी फुटत होती, वेगवेगळ्या झाडांवर फुले फुललेली होती. त्यामुळे नुसतं खाली चक्कर मारून आलं तरी मनावरचा ताण कमी व्हायचा. पण लेक फार कंटाळला होताशेवटी पंधरा दिवसांनी आम्ही बाहेर चक्कर मारून यायचं ठरवलं आणि काय आश्चर्य, बाहेर लोक बऱ्यापैकी नॉर्मल वाटले. अर्थात इथे सोशल डिस्टंसिंगचे नियम कडकच होते आणि अजूनही आहेतच. पण लोक नियम पाळून, मुलांना बाहेर घेऊन येत होते. हे बघून माझीही भीड चेपली. तेव्हाच मला जाणवलं की मी जितका ताण घेतलाय तसं वातावरण इथे नाहीये. अजिबात घबराटीचं वातावरण नाहीये. ते तेव्हाही नव्हतं आणि आताही नाहीये. लोक शांत आहेत

इथे लोकांना ऊन दिसलं की त्यांची घरं त्यांना उचलु उचलु फेकतात, त्यामुळे इथले लोक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून नदीकिनारी सूर्यस्नानाचा आनंद घेतच होते. जे लोक नियम पाळत नव्हते त्यांना समजवायला पोलिसही तत्परतेने सगळीकडे फिरत होतेच. सुरुवातीला पोलिसांची एक गाडी पूर्ण शहरात फिरत होती, त्यातून संदेश प्रसारित होत होता की महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा वगैरे

फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी होती आणि तिथे पण बरोबर दीड मीटरच्या अंतरावर पट्ट्या लावल्याच होत्या/आहेत. दुकानाच्या आत जाण्यापूर्वी तिथला एखादा कर्मचारी, आपल्याला दिली जाणारी बास्केट व्यवस्थित सॅनिटायझरने स्वच्छ करूनच आपल्या हातात देतो. दुकानाच्या आत मर्यादितच ग्राहक घेतले जात आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, साधारण मेच्या सुरुवातीला पूर्ण जर्मनीत दुकाने, दवाखाने आणि सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत

एकतर इथे आधीच लोकसंख्या कमी आणि त्यात जर्मन लोक नॉर्मलीच प्रचंड सोशल डिस्टंसिंग पाळणारे लोक आहेत त्यामुळे बाहेर पडल्यावर मला फार काही वेगळं वाटलंच नाही. माझी जर्मन शेजारीण तर खुश आहे अगदी, त्यांना हे सगळं फार आवडतंय. म्हणजे सगळीकडे अगदी मोजके लोक, कामापुरतेच दुकान चालू असणे वगैरे.

जर्मन लोकांच्या दोन अगदी जीव की प्राण गोष्टी म्हणजे फुटबॉल आणि बिअर. टाळेबंदी सुरु झाल्यापासून जर्मनीत मोठे कार्यक्रम आणि फ़ुटबॉल मॅचेस पुढील आदेश येईपर्यंत बंद आहेत, त्यामुळे इथल्या फुटबॉल प्रेमींमध्ये निराशा पहायला मिळतीये. खरं सांगायचं झालं तर आम्हालाही फार चुकल्याचुकल्या सारखं वाटतं आहे कारण आमच्या घराच्या जवळच एक मोठं फुटबॉल स्टेडियम आहे आणि दर महिन्यात एखादी तरी मॅच तिथे असते. मॅचमध्ये गोल झाल्यावर त्या स्टेडियम मधुन येणारा मोठ्ठा आवाज आणि मॅच सम्पल्यावर आमच्या आजुबाजूच्या बिअर गार्डन्समध्ये होणारी गर्दी आम्ही फारच मिस करतोय. बिअरबद्दल बोलायचं झालं तर, म्युनिकमध्ये होणारा जगप्रसिद्ध "ऑक्टोबरफेस्ट" हा बिअर फेस्टिव्हल यावर्षी रद्द करण्यात आला आहे कारण ह्या फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी जगभरातून साधारण ६० लाख लोक येतात.  

इथल्या लॉकडाऊनला मी तरी पार्शियल लॉकडाऊन म्हणेन कारण लोकांना घराबाहेर पडायला अजिबात मज्जाव केलेला नव्हता. एका कुटुंबातील सदस्य, मग ते कितीही असोत ते एकत्र कुठेही जाऊ शकत होते, सार्वजनिक वाहतूक चालु होती, महत्वाच्या सगळ्या सेवा चालू होत्या. पण आम्ही फक्त एक केलं ते म्हणजे सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे टाळली. आम्ही जिथे राहतो तिथे सगळी दुकानं जवळच आहेत त्यामुळे बस, ट्राम किंवा मेट्रोचा वापर करायची गरजच नाही पडली

मीडियामध्येही रोज सकाळी रॉबर्ट कॉख इंस्टीट्युटच रोजचे कोरोनाबाधितांचे आकडे प्रसारीत करते. त्यांची व्यवस्थित पत्रकार परिषद रोज असते. बाकी कोणीही अधिकृत आकडे देऊ शकत नाही. लोकांमध्ये घबराट पसरवणारी कोणतीही बातमी मी अजूनपर्यंत तरी वाचली किंवा ऐकली नाही. तसेच जर्मनीने सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती केली असेल तर ती म्हणजे टेस्टिंग. त्यांनी आधी विषाणूसाठी मोठ्या प्रमाणात टेस्ट्स केल्या नंतर ह्या टेस्ट्सबरोबर देशातील सगळ्यात जास्त कोरोनाबाधित असलेल्या भागात अँटीबॉडी टेस्ट्स सुरु केल्या. अँटीबॉडी टेस्ट म्हणजे तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होऊन गेलाय आणि तुमच्या रक्तात त्याच्याशी लढणाऱ्या अँटीबॉडीज आधीच तयार झाल्या आहेत. ह्या टेस्टमध्ये विषाणूची तपासणी करता तुमच्या शरीराने ह्या विषाणूविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण झालीये कि नाही हे तपासतात. म्हणजेच तुमच्यात कोविड-१९ विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झालीये कि नाही हे बघणे. ह्या टेस्ट्स त्यांनी जास्त करून रँडम निरोगी लोकांवर केल्या जेणेकरून त्यांना हे कळलं कि किती टक्के लोकसंख्या इम्यून झालीये

तरीही आजघडीला जर्मनीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या एक लाख सत्तर हजाराच्यावर आहे. पण सगळ्यात जमेची बाजू काही असेल तर ती म्हणजे सध्या ह्यातुन सुखरूप पार पडलेल्या म्हणजेच ह्या संसर्गातून बरे झालेल्या लोकांचा आकडा साधारण दीड लाखाच्या जवळपास आहे आणि मृत्युदर इतर युरोपिअन देशांच्या मानाने खूपच कमी आहे. ह्या ज्या जर्मनीच्या जमेच्या बाजू आहेत त्या इथल्या लोकांच्या काटेकोरपणे कायदे आणि नियम पाळण्याच्या सवयीमुळे आहेत. तसेच इथली शासकीय आणि आरोग्ययंत्रणा फारच भक्कम आहेत आणि लोकांचा स्वतःच्या सरकारवर विश्वास आहे.

इतर देशांप्रमाणे इथल्या अर्थव्यवस्थेवरही ह्या टाळेबंदीचा परिणाम झालाच आहे. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जर्मनीत ह्या विषाणूमुळे होणारे परिणाम लक्षात घेता अर्थव्ययस्थेला चालना देण्यासाठी 750 बिलियन युरोजचं मदतीचं पॅकेज जाहीर केलं. त्यामुळे अनेक कंपन्या, पगारदार लोकांना दिलासा मिळाला आहे. अश्या बिकट परिस्थितीत आपली नोकरी जाते की काय ही सर्वात मोठी चिंता असते. पण काही प्रमाणात का होईना सरकारने जबाबदारी घेतल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.

जेव्हा लॉकडाऊन जाहीर केले त्याच्या आसपासच जर्मनीने देशाच्या सीमा पूर्णपणे बंद केल्या होत्या. पण आता १५ जूनपासून हळूहळू ह्या सीमा उघडल्या जातील. वर्ल्ड वॉर नंतर पहिल्यांदाच अश्या भूतो भविष्यती गोष्टी युरोपमध्ये घडत आहेत. त्यातलीच अजून एक गोष्ट म्हणजे मार्चमध्ये जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्कल, ज्या स्वतः एक वैज्ञानिक आहेत, त्यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदा देशातील लोकांशी टीव्हीवरून थेट संवाद साधला. त्यांनी लोकांना ह्या बिकट परिस्थितीत शिस्त पाळण्याचे आणि एकता ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या म्हणाल्या की "हे कोरोनाचे संकट म्हणजे वर्ल्ड वॉर नंतरचे सगळ्यात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून त्याचा सामना करायचा आहे". चॅन्सलर अँगेला मर्कल ह्यांनी कोरोनाच्या लसीच्या विकासासाठी सुद्धा मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे

तसं म्हणलं तर माझ्या आयुष्यात फार फरक पडला नाहीये, कारण मी पहिल्यापासूनच वर्क फ्रॉम होमच करते, इथे घरातली सगळी कामे आम्ही दोघे मिळूनच करतो, लेकाला आताशा बऱ्याच गोष्टी करायला शिकवतोच आहोत; फरक फक्त एकच आहे की हे दोघे आता सतत घरातच असतात त्यामुळे माझ्या स्वातंत्र्यावर गदा आलीये! ;) गमतीचा भाग सोडला तर खरंच इथे आधी जसं होत तसंच आयुष्य थोड्याफार फरकाने चालू आहे, वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं की इथल्या मित्रमैत्रिणींना भेटता येत नाहीये. तेही लवकरच भेटता येईल अशी आशा आहे! ह्या सगळ्या "दुःखात सुख" म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडिया, त्यांच्यामुळे जास्त एकटेपणा जाणवला नाही. लेक तर रोज भारतात त्याच्या आजी-आजोबाना,भावांना आणि इथल्या मित्रांना व्हिडीओ कॉल करून गप्पा मारत बसतो. तो आणि त्याचा एक मित्र तर व्हिडीओ कॉल करून एकत्र अभ्यास करत आहेतआम्ही पण घरचे सगळे आठवड्यातून एकदा कॉन्फरन्स कॉलवर गप्पा मारतो

या आठवड्यात सगळी दुकाने आणि मॉल्स उघडले आहेत पण सगळे नियम पाळून आणि पुढच्या आठवड्यात शाळा सुरु होणार आहेत. लेक दोन महिन्यांनी शाळेत जाणार म्हणून धाकधूक वाटती आहे जरा, पण आता एक कळून चुकलं आहे की हा विषाणू आपल्यासोबत दीर्घकाळ राहणार आहे त्यामुळे आपण जर सोशल डिस्टंसिंग, वैयक्तिक स्वच्छता आणि मास्कचा वापर ह्या गोष्टी नीट पाळल्या तर कोविड-१९ चा धोका बराच कमी होतो. त्यामुळे "Lets hope for the best!" एवढं सगळं असूनही जर कोरोनाबाधितांची संख्या वाढली तर सरकार पुन्हा लॉकडाऊन करणारच आहे.

लोक म्हणतायेत की आता यापुढे जग दोन कालखंडात विभागलं जाणार, पहिला म्हणजे कोरोना महामारीच्या आधीचा आणि दुसरा म्हणजे त्यानंतरचा. त्यामुळे जग थोड्याफार प्रमाणात बदलेलंच. ते म्हणतात ना "Change is good", असाच विचार करुन आपल्या सगळ्यांना पुढे वाटचाल करावी लागेल. सध्यातरी येईल त्या परिस्थितीचा सामना सकारात्मकतेने करणे, एवढंच आपल्या हातात आहे. त्यामुळे नियम पाळूया आणि कोरोनाला पळवूया!

ज्या लोकांना घरून काम करणेच शक्य नाहीये, जे डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्यविभागातले कर्मचारी लोकांची सेवा करत आहेत, जे सफाई कर्मचारी निगुतीने स्वतःचं काम करत आहेत, जे पोलीस कर्मचारी आणि सरकारी अधिकारी जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत आहेत, जे बँक कर्मचारी रोज जीव मुठीत घेऊन बँकेचे व्यवहार सांभाळत आहेत, ह्या आणि अश्याच अनेक लोकांना मनोमन नमन. अजून एक गोष्ट बघून जीव तुटतो, ती म्हणजे भारतातील हातावर पोट असणारी लोकं पायी स्वतःच्या घरी जात आहेत. त्यांचंही आयुष्य लवकरच सुकर होवो

कधीकधी वाटतं हे एक दुःस्वप्न आहे आणि मला जाग आल्यावर सगळं अगदी पूर्वीसारखं असेल, मला पटकन भारतात जाता येईल आणि सगळ्या जिवलगांना कडकडून मिठी मारता येईल! हे असं सगळं होण्यासाठी, ह्या अतिसंसर्गजन्य विषाणूवर लवकरात लवकर एखादं औषध किंवा लस मिळावी आणि पूर्ण जगावर असलेली कोविड-१९ विषाणूची टांगती तलवार नाहीशी व्हावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक


वाचकांना आवडलेले काही