शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

मोबाइलपुराण

    
 आजचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरु होतो. ठरलेल्या रुटीन प्रमाणे ती तिचं आवरुन शाळेत पोहोचते. शाळा नुकतीच सुरु झालेली असते त्यामुळे तिच्यावर कामाचा जरा जास्त ताण असतो.
नवीन सुरु झालेल्या शाळेचं एडमिन सांभाळणे म्हणजे काही चेष्टा नाहीये. नवीन ऍडमिशन्स, नवीन शिक्षक, वर्षाचे टाईमटेबल वगैरे वगैरे. एक नाही दहा. एकमागुन एक काम ती हातावेगळी करते.
एव्हाना शाळेची वेळ संपत आलेली असते. तितक्यात हाताखालच्या मावशीनी तिला सांगितले की तिला बाहेर बोलवलं आहे.
बाहेर मुलांना घरी सोडणारी ओमनी वॅन उभी असते. एका नवीन मुलाचे नाव त्या वॅन च्या लिस्ट मधे नसल्यामुळे चालक तिची वाट पाहत असतो.ती गडबडीत ओमनीच्या खिडकीच्या काचेवरच कागद ठेवुन त्या मुलाचं नाव लिस्ट मधे टाकते आणि ओमनी तिच्या प्रवासला निघते.

     ती पुन्हा ऑफिस मधे येऊन तिच्या कामाला लागते. आणि तिला आठवतं की तिला एका पब्लिशर ला फोन करायचा आहे. म्हणुन ती तिचा मोबाइल शोधयला लागते. जो तिला तिच्या आत्ताच झालेल्या वाढदिवसाला तिच्या ह्यांनी भेट दिलेला असतो.
पर्स शोधुन होते, टेबल बघितला जातो, शाळेतील सगळ्या सहकाऱ्याना विचारून झालेले असते पण फोन कुठेही सापडत नाही. आता तिला हेही आठवत नसतं की शेवटी आपण फोन ठेवला कुठे?

      तिला तिच्या ह्यांना कॉल करायचा असतो तर तिच्या लक्षात येतं की फक्त एक नंबर सोडुन कोणताही नंबर तिला पाठ नाहीये आणि तो फोन नंबर हयांचा नसुन लहाणपणी घोकलेला माहेरच्या घरचा आहे. म्हणजेच औरंगाबादचा आहे. "काय चाललय यार..डोक्याचा भुगा झालाय विचार करून पण ह्यांचा नंबर आठवत नाहीये. त्याला कळलं तर.." नकोच तो विचार. आणि प्रचंड तणावात एका कलिगच्या फोनवरुन घरी कॉल लावते.
वडील फोन उचलतात. ती " बाबा मला जरा ह्यांचा नंबर देता का? माझा फोन हरवला आहे."
बाबा तिच्यावर प्रश्नंचा भडीमार करतात. "असा कसा हरवला फोन? तुला साधा नवऱ्याचा नंबर पाठ नाही? कसं होणार तुम्हा मुलींचं." ती सगळ गपगुमान ऐकून घेते. ते नंबर देतात.
एव्हाना शाळेतील सहकारी आणि तिचे आई वडील तिच्या फोनवर सतत कॉल करत असतात. पण नुसती रिंग वाजत असते.
आता तिला खूप टेंशन येतं. "एवढा महागाचा मोबाइल. गेला आता. 15 दिवसांपूर्वीच सिनेमाला गेलो होतो तेव्हा थिएटर मधे विसरला होता.. बरं झालं ह्याने पटकन जाऊन शोधला तर सापडला. आज जर नाही सापडला तर काही धडगत नाही माझी. इतकी कशी वेंधळयासारखी वागते मी!" असो.

ती जरा घाबरतच ह्यांना कॉल करते "अरे माझा फोन सापडत नाहीये." समोरून 1 मिनिट काहीच रिप्लाय येत नाही. ती "मला काहीच सुचत नाहीये. प्लीज सांग ना मी काय करु? " आवाज शक्य तितका शांत ठेवत तो "पोलिस कंप्लेन्ट करावी लागेल आणि तुझे दोन्ही नंबर्स ब्लॉक करावे लागतील. असं कसं करतेस तु? मागच्या महिन्यातच घेतला आहे ना फोन."
तिला माहित असतं ही वादळापुर्विची शांतता आहे. ती ओके म्हणुन फोन ठेवते आणि पोलिस स्टेशनला जाण्यासाठी निघणार तोच एका कलिग चा आवाज येतो "अहो मॅडम तुमचा फोन सापडला!" तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही. "अहो तुमचा फोन वॅनच्या ड्रायव्हर कडे आहे." तिचा जिवात जीव येतो.
आणि तिच्या लक्षात येतं की त्या मुलाचं नाव लिहिताना तिने फोन ओमनी च्या टपावर ठेवलेला असतो आणि ते ती पार विसरून गेलेली असते. एव्हाना औरंगाबादला पण कळालेलं असतं की फोन सापडला आहे कारण तेही तिच्या फोनवर सतत कॉल करत असतात.

तर असा हा चमत्कारी फोन बाणेर-बालेवाडी-पिम्पळे निलख-औन्ध-बाणेर (पुणे शहरातील एरिया)असा प्रवास ओमनीच्या टपावरच करतो. एवढे सगळे खड्डे, स्पीड ब्रेकर्स, आणि कोणत्याही सिग्नलला कोणाच्याही नजरेला न पडता शांतपणे टपावर बसुन असतो. जेव्हा कोणीतरी ड्रायव्हरला फोन करून सांगतं की मोबाईल ओमनी मधे आहे का बघ तेव्हा हा चमत्कारी फोन त्याला निवांतपणे टपावर पहुडलेला दिसतो.
अशा रीतीने "देव तारी त्याचा नविन मोबाईल कोणी न चोरी किंवा कुठेही ना हारवे" ह्या नविन म्हणीचा प्रत्यय तिला येतो.
त्या दिवसा नंतर हा चमत्कारी मोबाईल कोणाच्याही दृष्टिसही पडलेला नाहीये कारण तो आता तिच्या खास मोबाईल साठी घेतलेल्या पर्समधे विराजमान असतो आणि फक्त कामापुरताच बाहेर येतो.

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #punediaries

पॅरीस

          मला असं वाटतं की युरोप टूर करायची आणि पॅरिसला जायचच नाही हे म्हणजे चार धाम यात्रेला जाऊन द्वारकेला न जाण्यासारखं आहे. तर ऑक्टोबर मधे आम्ही पॅरिस ला जायची तयारी करत होतो. नोव्हेंबर मधील एक दिवसही निश्चित केला. सगळी बुकिंग वगैरे करणार तर असं कळालं की ह्यांना नेमके तेच दोन दिवस महत्वाच्या मीटिंग्स आहेत त्यामुळे प्लान रद्द करावा लागला. माझं मन खूप खट्टू झालं. कारण डिसेम्बर पासुन पुढे एकतर भयंकर थंडी असते आणि त्यात पुन्हा बर्फ. सगळा प्लान एप्रिलच्या पुढे ढकलवा लागला. राहून राहून वाईट वाटत होतं पण...
आणि थोड्याच दिवसात ती बातमी आली की पॅरिस मधे दहशतवादी हल्ला झालाय. मन सुन्न करणारी बातमी. आत्ता आम्ही पॅरिस मधेच असतो...विचार करुनच अंगावर सरसरुन काटा आला. असो.
शेवटी एकदाचा पॅरिसला जाण्याचा योग जुळून आला. लेकाच्या शाळेला सुटया होत्या त्या दरम्यान आम्ही 3 दिवसांचा दौरा ठरवला.
        निघायचा दिवस उजाडला. विमानतळावर जाण्यासाठी आम्ही मेट्रो मधे बसलो होतो आणि लेकाने हळूच माझ्या कानात विचारले "आई टेररीस्ट अटॅक(दहशतवादी हल्ला) नाही होणार ना गं आपण पॅरिसला गेल्यावर?" आपण एखादं गोड स्वप्न पाहत असावं आणि कोणीतरी तो जोरात वाजणारा अलार्म आपल्या कानाशी लावून आपल्याला उठवावं. अगदी तशीच झाली माझी अवस्था लेकाचा प्रश्न ऐकून. खरतर असले काही विचार करून घाबरायलाच होतं पण मुलांसमोर आपण खुप शूर आहोत हेच दाखवावं लागतं. मी धीर करून म्हणाले " नाही रे. असं कहीही होणार नाही बघ. तु रिलॅक्स रहा." माझा उत्तराने त्याचं फारसं समाधान जरी झालं नसलं तरी तो थोडा रिलॅक्स झाला. पण माझा डोक्यात आता नाही नाही ते विचार सुरु झाले. अशा रीतीने आमचा प्रवास सुरु झाला.
       विमान पॅरिसच्या जवळ आल्याचं वैमानिकाने संगितल्यावर मी आणि नवरा खिडकीतुन आयफेल टॉवर दिसतोय का ह्यावर जोरजोरात चर्चा करायला लागलो. कारण आयफेल टॉवर पॅरिस मधे नक्की कठेु आहे हे आम्ही आधीच नकशावर पाहून ठेवल होतंं
"अगं दिसेल कदाचित."
"अरे ती नदी दिसते आहे की...तिच्या जवळच आहे ना!"
"हो खरं.. दिसायला हवा."
आमचा असा संवाद चालू असताना लेक म्हणाला " तुम्ही दोघे जरा हळू बोलताल का? आजुबाजुचे लोक तुमच्याकडे बघत आहेत. आणि आई आता पॅरिसला गेल्यावर दिसेलच ना तुला आयफेल टॉवर.. so just chill." आमचा आवाज बंद एकदम. आमचं विमान सरळ खाली आलं.
        दुपारची वेळ होती त्यामुळे खुपच भुक लागली होती म्हणुन आधी काहीतरी खाऊन मगच हॉटेलवर जायचं ठरवलं. ह्यांनी आधीच मला सांगून ठेवलं होतं की "सरवण भवन (साउथ इंडियन रेस्टॉरंट ची चेन आहे यूरोप मधील)" ला जायचच आहे. भारतीय लोकांनी पॅरिसला जाऊन तिथे गेलं नाही तर पाप लागतं म्हणे. तर हे सरवण भवन एका टोकाला, आयफेल टॉवर दुसऱ्या टोकाला आणि आमचं हॉटेल तिसऱ्या टोकला असं काहीतरी नकाशा दाखवत होता.मजल दरमजल करत आम्ही निघालो.
         म्युनिच मधील अप्रतिम लोकल ट्रांसपोर्टची सवय असलेले आम्ही पॅरिसच्या लोकल ट्रांसपोर्टला इतक्या शिव्या घालत होतो की काय सांगु. एकतर भुलभूलैय्या सारखे स्टेशन्स. बरं तो भुलभूलैय्या तरी एकाच लेवल वर असावा ना. पण नाही. चित्रविचित्र बोळवजा रस्ते. मधेमधे खाली नाहीतर वर जाणाऱ्या पायऱ्या. भयंकर कनफ्युजिंग स्टेशन्सची नावं. ह्या सगळ्या मधे भर म्हणुन प्रचंड गर्दी. लेक तर पहिल्याच प्रवासात वैतागला. "काय तुम्हाला त्या सरवण भवनला जायचय. किती वेळ लागतोय. मला भुक लागली आहे. चांगलं मॅकडोनाल्ड्ला गेलो असतो. वगैरे वगैरे."
       कसतरी त्या स्टेशनला पोहोचलो. तर तिथूनही 10 मिनट चालावं लागलं. तर ही जी गल्ली होती ना ती म्हणजे भारतातील एखाद्या शहरातील बाजारपेठ वाटली अक्षरश:.साड्या आणि पंजाबी ड्रेसेसचे दुकाने, किराणा मालाची दुकाने, भारतीय रेस्टॉरंटस्. मस्तच वाटलं एकदम. सरवण भवनचे चवदार दाक्षिणात्य पदार्थ खाऊन पोट तर भरलं पण मन नाहीच.
पुन्हा त्या भूलभुलैय्या स्टेशन्स आणि विचित्र अशा मेट्रोज मधून प्रवास करून हॉटेलवर फ्रेश होऊन आम्ही आयफेल टॉवर खालील स्टेशनला पोहोचलो.
       आणि तो क्षण आला. आम्ही आयफेल टॉवरला आलो. खरतर लोखंडी टॉवर आहे तो. जवळून फार आकर्षक वगैरे वाटत नाही. पण तिथला परिसर, ते टॉवरचं प्रचंड धूड, ती बाजूने वाहणारी नदी, खुप उत्साही लोक, नवीन लग्न झालेली 1-2 युरोपिअन कपल्स, त्यांची तिथे फोटो काढाण्यासाठी चाललेली लगबग, मराठी लोकांची केसरीची आलेली टुर. तिथल्या आनंद आणि उत्साहाची लागण आम्हालाही झालीच. प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे पळून गेला. मस्त टॉवरवर जाऊन सगळं पॅरिस शहर नजरेत साठवून घेतलं. खाली येऊन तिथल्या बागेत बराच वेळ बसुन राहिलो. किती वेळ गेला कळलच नाही. एव्हाना थंडी वाढायला लागली होती. लेक इतका थकला होता की तिथेच पेंगायला लागला. त्याचं सुरु झालं. भुक लागली. झोप आली. आम्ही म्हणत होतो की थोडा वेळ थांब, रात्री टॉवरला मस्त लाइट्स लागतील. तेवढे बघु आणि जाऊ. पण आपलं लगेच ऐकतील ते मुलं कसली. त्याचं आपलं एकच, त्यात काय बघायचं. मला झोप येतीये आपण उदया येऊ लाइट्स बघायला. शेवटी आम्हाला निघावच लागलं.मला तर स्वप्नात पण आयफेल टॉवरच दिसत होता.
         दुसऱ्या दिवशी लेक खुपच खुश होता. त्याची आवडती डिजनीलँडची दिवसभराची सफर होती. पुन्हा त्याच भयंकर भूलभुलैय्या मधून आम्ही डिजनीलँडला पोहोचलो. तर बारीक पाऊस सुरु झाला आणि तो दिवसभर पडतच होता. तरीही आमचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही कारण परिकथा खरी वाटावी असं काहीसं फीलिंग होतंं ते. आम्ही दोघांनीही लहान होऊन सगळ्या राईड्सचा लेकाबरोबर आनंद घेतला, मिकी माउस सोबत फोटो काढला, डिजनीच्या वेगवेगळ्या सिनेमाच्या कॅरेक्टर्सला भेटलो, कार्सचा प्रचंड थरारक असा शो पाहिला, गोड बाहुल्यांचा डांस पहिला. दिवस कसा गेला कळलच नाही. मला तर तिथून निघायची ईच्छाच नव्हती. लहानपणी वाचलेल्या परीकथेमधे जाऊन आल्यासारखं वाटलं. म्युनिच मधे आल्यापासुन चालायची सवय लागली म्हणुन नाहीतर त्या दिवशी डिजनीलँडमधे आम्ही 15 किलोमीटर चालूच शकलो नसतो. इतकं चालुनहि आमचा बराचसा भाग बघयचा राहीलाच.दुसऱ्या दिवशी दुपारच विमान होतं म्हणुन मी आता सरळ आयफेल टॉवरला जायच हट्ट धरला. मला रात्रीची रोषणाई बघायचीच होती. म्हटलं पुन्हा योग येइल की नाही माहित नाही.
       खरतर दिवसभर चालून पायाचे तुकडे पडायचे बाकी होते तरीही मला जायचच होतं. रडतपडत लेक तयार झाला यायला.
आम्ही टॉवरच्या जवळ पोहोचलो छान लाइट्स दिसत होते आणि तेव्हढयात मुसळधार पाऊस सुरु झाला. आम्ही जवळच्या बस थांब्याचा आधार घेतला. जवळ छत्री पण नव्हती. तिथे तरी किती वेळ थांबणार म्हणुन जी बस आली त्यात चढलो. वेड्यासारखं पाऊस थाम्बेपर्यन्त बस जिथे जातेय तिकडे निघालो. तो टॉवर ती रोषणाई राहिले बाजूला अन आम्ही बसमधे. कसातरी थोड़ा पाऊस कमी झाला आणि आम्ही एका स्टॉपवर उतरून पुन्हा टॉवरकडे जाणारी बस पकडली. टॉवर जवळ आलो तर पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. कसंबसं एका दुकानातुन अव्वाच्या सव्वा भावाला छत्री घेतली. भयंकर भुक लागलेली. शाकाहारी लोकांचे खाण्याचे फार वांदे होतात इकडे. पटकन काहीही मिळेना. लेकाचा चेहरा बघुन मला उगीचच अपराधी वाटायला लागलं. शेवटी एक सबवे सापडलं आणि तिथे आमच्या नशिबाने शाकाहारी सॅंडविच होतं. आम्ही अक्षरश: तुटून पडलो सॅंडविचवर. 
       सकाळी लवकर आवरुन "लुवरे म्युज़िअमला" जायचं होतं. आतापर्यंत फक्त फोटो मधे पहिलेलं मोनालिसाचं चित्र प्रत्यक्ष पहायचं होतं. पण घोळ माझ्या पाचवीलाच पुजलेले आहेत बहुतेक. संध्याकाळी 5 वाजताचं विमान असल्यामुळे आम्हाला 3.30 वाजेपर्यंत विमानतळावर पोहचणे गरजेचे होते. सकाळी सगळं सामान घेऊनच निघालो. त्या भयंकर भुलभलैया स्टेशन्स मधून प्रवास करत असताना. एका स्टेशनला ट्रेन बदलावी लागणार होती म्हणुन आम्ही एका ट्रेनमधून ऊतरलो तर माझा लक्षात आलं की आत्ताच घेतलेली पाण्याची बाटलीआतच राहिली. ती ट्रेन तिथे 5 मिनिट थांबणार आहे अशी घोषणा आम्ही ऐकली होती म्हणुन मी नवऱ्याला सूचना(त्याच्या भाषेत आदेश) केली की पटकन जाऊन बाटली घेऊन ये ना. आणि जसं काही तो ट्रेन मधे चढायचीच वाट पाहत असल्यासारखी ट्रेन निघाली की. बाहेर लेकाने भोंगा पसरला "बाबाआआ..." मला काही सुधरेना. आजूबाजूचे लोक संशयाने माझ्याकडे बघत होते की पोरगं नक्की हीचच आहे ना. मीे कसंबसं लेकाला शांत केलं. तिकडे तो वैतागला. पुढच्या स्टेशनला उतरून पुन्हा भुलभुलैया पार करावा लागणार. आधीच उशीर होत होता. त्याच्याकडे तिकीट होतं आणि स्टेशनच नाव लक्षात होतं म्हणुन बरं नाहीतर तिथेच हरी हरी करायची वेळ आली असती. कसाबसा तो आमच्याकडे पोहोचला. तर लेक बिलगलाच त्याला. आणि ह्यांनी जो लुक दिला ना मला तो मी कधीच विसरणार नाही. ते नसतं का आपण मुलाना लोकांच्या घरी त्रास देत असले की म्हणतो आत्ता थांब तु, तुला घरी गेल्यावर बघते. अगदी तसा लुक होता तो.


       ह्या सगळ्या गोंधळात एक तास गेला. कसेतरी आम्ही म्युज़िअमला पोहोचलो तर तिथे प्रचंड गर्दी. तिथे विचारलं किती वेळ लागेल तर ते म्हणाले कमीत कमी चार तास लागतील मोनालिसा पर्यन्त पोहोचायला आणि आमच्याकडे दोनच तास होते. मग काय म्युज़िअमच्या बाहेर थोडा वेळ घालवुन आम्ही विमानतळाकडे निघालो. तर ठिकठिकाणी पोलिस दिसत होते. मनात शंकेची पाल चुकचुकली. पण नंतर कळालं की तिथे पोलिस दिसतात.
   विमानतळावर पोहोचल्यावर मोठा धक्काच बसला. त्यानंतरची सगळी विमानं रद्द केलेली होती कारण त्या दिवशी कोणाचा तरी संप होता. हाय रे कर्मा. एअरलाइन वाले म्हणाले की उद्या पहाटे 6 ची फ्लाइट देतो. नाहीतर पैसे देतो. पैसे परत घेऊन काय डोम्बल होणार होतं. गपगुमान सकाळच्या विमानाची तिकीटे घेतली. आता पुन्हा हॉटेल बघावं लागणार होतं. पुन्हा भूलभुलैय्यातुन शहरात जायच जीवावर आलं आणि पुन्हा पहाटे सहाच विमान म्हणजे चारलच इथे पोहोचावं लागणार त्यामुळे तिथेच एक हॉटेल घेतलं. तो दिवस पूर्णपणे वाया घालवुन आम्ही दुसऱ्या दिवशी म्यूनिचला परतलो.
   आणि पॅरिस नावाचा एक सुंदर स्वप्नवत अनुभव मी मनात साठवून ठेवला
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #parisdiaries

     







माझी खाद्ययात्रा


          आज एका मैत्रिणीशी बोलत होते कि म्युनिचला आल्यापासून आमचं हॉटेलिंगचं प्रमाण खूपच कमी झालं आहे. एकतर आम्ही शाकाहारी आणि त्यात इथले मुख्य अन्न ब्रेड, बटाटे आणि मांसाहार असल्यामुळे बाहेर खाण्याचे पर्याय खूपच कमी. तरीही आम्ही बरेच पर्याय शोधले कारण मुळातच खाण्याची आवड आणि आईच्या मते मला असणारा स्वयंपाकाचा कंटाळा. 
३०० पेक्षा अधिक प्रकारचे ब्रेड आणि १२०० पेक्षा अधिक प्रकारचे रोलस् आणि मिनी ब्रेड (Brötchen & Kleingebäck) जर्मनीत तयार केले जातात. आपल्याकडे कश्या पावलापावलावर चहाच्या टपऱ्या असतात तश्या इथे बेकऱ्या आहेत. अप्रतिम चव आहे ब्रेड्सची. ब्लॅक फॉरेस्ट केकचा जन्म इथलाच. खूपच चविष्ट आहे हा केक. बटाट्याचे फ्रेंच फ्राईज सुद्धा ठिकठिकाणी मिळतात. इथे आल्यापासून कळून चुकलंय कि मराठी माणूस नुसत्या बटाट्याचे कितीतरी विविध पदार्थ करू आणि खाऊ शकतो. काळी कॉफी पण खूपच आवडीची आहे ह्या लोकांची. आणि बिअर तर पाण्याला पर्याय असल्यासारखी पितात. इथली थंडी पाहुन कळतं ते. आता तर काय "ऑक्टोबर फेस्ट" येऊ घातलाय. लाखो लिटर बिअर फस्त होते म्हणे. म्युनिचला "ऑक्टोबर फेस्ट" ची पंढरी म्हणायला हरकत नाही. देशोदेशीचे लोक खास तेवढ्यासाठी येतात इथे.
        खाण्याच्या आवडीवरून सहजच आठवलं की साधारण दहावी बारावीला असल्यापासून पाणीपुरी खाण्याचे लागलेले व्यसन. कारण थोडेफार पैसे तेव्हाच असायचे जवळ. आमच्या औरंगाबादची पाणीपुरी म्हणजे नुसता जाळ आणि तेव्हा १ रुपयात ८ पुऱ्या मिळायच्या. चंगळच होती तेव्हा ती. प्रत्येक एरिया मधल्या बेस्ट पाणीपुरी माहित होत्या आम्हा मैत्रिणींना. भेळ खावी तर औरंगाबादचीच आणि ती सुद्धा औरंगपुऱ्यातील साईवाल्याकडची. अजूनही औरंगाबादला गेले तर ही भेळ खातेच. फक्त तेव्हा आणि आता मध्ये फरक फार मोठा आहे, तेव्हा जास्त बाहेर खाल्ल की वडील रागवायचे आणि आता स्वतः जाऊन माझ्यासाठी भेळ घेऊन येतात. आणि आईला म्हणतात खाऊ दे ग तिला.
      गायत्री चाट भांडारची कचोरी पण अगदी प्राणप्रिय. मूगवडे पण मस्तच असतात इथले. पण आताशा जुनी चव नाही राहिली कचोरीला. ही कचोरी ६० पैसे प्रति नग असल्यापासून खाल्ली आहे. माझं आजोळ औरंगाबादचं असल्यामुळे सुटीतील ठरलेला कार्यक्रम असायचा. लहानपणी आज्जीकडे खाल्लेल्या खारीची चव अजूनही जिभेवर तशीच आहे. मुस्लिमबहुल असल्यामुळे खारी खूप छान मिळते तिथे. आप्पा हलवाईचा पेढा. लहापणीपासून अगदी तीच चव अजिबात बदल नाहीये चवीत. ह्या पेढ्याशिवाय दहावी बारावी पास झाल्याचं सुख मिळत नाही. क्रांतिचौकातील पावभाजी खायला जाणे म्हणजे सोहळा असायचा. तारा पान सेंटरच्या पानाची चव अद्वितीय. अजूनतरी तसं पान कुठे खाल्ल्याचं आठवत नाही.
     नंतर जॉब साठी पुण्याला आल्यावर आमचं खाद्य अवकाश बऱ्यापैकी विस्तारलं. त्यात मिसळ आणि अमृततुल्य चहाची विशेष भर पडली. पुण्यात तसं सगळंच चवदार मिळतं. पण मला विशेष आवडलेले म्हणजे मस्तानी, मथुराची शेवभाजी आणि तांदळाची भाकरी, आशा डायनिंग, बादशाही, जनसेवा मधले सात्विक जेवण, मानकरचा कट डोसा, काटाकिर्रची मिसळ,पावसाळ्यात सिंहगडावर खाल्लेले पिठलं भाकरी, कांदा भजी. तसे अजून गावात बरेच खाण्याचे पर्याय असतील ज्यांना भेट दिली नाहीये. बाणेरला राहायला गेल्यापासून इड्लीशिअसच्या वाऱ्या ठरलेल्या होत्या. इड्लीशिअस नावाचं छोटंसं रेस्टॉरंट म्हणजे ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड. इथल्या रस्समला तोड नाही. बाकी औंध बाणेरचे बरेच हॉटेल पालथे घालून झाले आहेत.
     दादा मुंबईला होता तेव्हा बोरिवलीमध्ये खाल्लेले ठेल्यावरचे सँडविच आयुष्यात विसरणार नाही. विक्रोळीच्या स्टेशनवरची SPDP (शेव बटाटा दही पुरी). काय अप्रतिम चव होती म्हणून सांगू. मला नंतर कधीही तसं सँडविच आणि SPDP खायला मिळाली नाही. काहीकाही पदार्थ आणि त्यांची विशेष चव पुन्हा कधी खायला मिळतच नाही. जसं की आईच्या हातचे पदार्थ. जे की आईकडे गेल्याशिवाय खायला मिळतच नाहीत. असो.
    म्युनिचला आल्यावर पहिला बाहेरचा खाल्लेला पदार्थ म्हणजे मॅकडोनाल्डचे बर्गर. अर्रर्र भयंकर चव आहे. इथे बेचव खाण्याची प्रचंड आवड आहे लोकांना. ह्यांचं जेवण आपण भारतीयांना अळणी आणि बेचव असच वाटतं. आपल्याकडचे चायनीज रेस्टॉरंट, डॉमिनोज किंवा पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड हे सगळे व्यवस्थित भारतीय चवीप्रमाणे खायला घालतात. इथे कसलं काय. मग आम्ही एक्सप्लोर करायला सुरुवात केली.
    इथेही बऱ्याच देशांच्या खाद्यसंस्कृती एकत्र नांदतात. त्यात सगळ्यात जास्त तुर्किश रेस्टॉरंट्स आहेत. इथे तुर्की लोकांचा प्रमाण बरच आहे. ह्यांच्याकडे मिळणारे शाकाहारी पदार्थ म्हणजे फलाफल सँडविच(पावमधे भरपूर भाज्या आणि फलाफल ) किंवा फलाफल रोल(मैद्याच्या पोळीत भरपूर भाज्या आणि फलाफल) किंवा भात आणि फलाफल. फलाफल म्हणजे काबुली चण्याचे वडे. हे २-३ वडे, भरपूर भाज्या, दह्याची आणि चिंचेची चटणी एका मोठ्या पावात टाकतात. चव बरीच चांगली आहे. ह्यांचं "हम्मस(कबुली चणे भिजवुन केलेला पदार्थ)", "बकलावा" पण खूप प्रसिद्ध आहेत.
    तुर्किश खालोखाल इटालियन आणि एशिअन रेस्टॉरंटस आहेत इथे. इटालियन पास्ता आणि पिझ्झा अप्रतिम मिळतो. व्हेनिसला खाल्लेला पिझ्झा पण असाच नेहमीसाठी लक्षात राहीला. काय अफलातून चव होती तिथल्या चीझची. खरतर प्रत्येक देशात किंवा प्रांतात जाऊनच तिथले ऑथेंटिक पदार्थ खायला हवेत. ते म्हणतात ना "जावे त्यांच्या देशा " अगदी तसच.
इथल्या एशिअन रेस्टॉरंटस मधे नूडल्स आणि फ्राईड राईस मिळतो पण बेचव. इंडियन रेस्टॉरंट्सचे जेवण पण फार चवदार नसते. मधे एका इथिओपिअन रेस्टॉरंटला जाण्याचा योग आला. छानच होते पदार्थ. अजून बरेच ऑपशन्स शोधायचे आहेत इथेही आणि भारतातही. आपल्याकडे तर काय गाव बदललं कि पदार्थ करण्याची पद्धत आणि चव बदलते अगदी भाषेप्रमाणे. त्यामुळे भारतात प्रत्येक राज्यात जाऊन तिथल्या डेलिकसीज खायची इच्छा आहे. बघूया कसं आणि कधी जमत ते.
ता.क. : औरंगाबाद, पुणे आणि म्युनिच मधील लोकांनी चूकभूल द्यावी घ्यावी.
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #munichdiaries

किस्सा ए मॅगी काकू #२


  नोव्हेंबर महिन्यातली थंडगार सकाळ होती. आनंद आणि दु:खाच्या हिंदोळयावर मी सकाळची कामं उरकत होते. आनंद यासाठी की वर्षभरानंतर दादाची भेट झाली होती. त्याच्या बिझनेस मीटिंग साठी तो जर्मनी मधे आला होता. पण मिटिंग फ्रैंकफर्टला असल्यामुळे तो एकच दिवस मुनिचला येऊ शकला म्हणुन थोडं दु:ख. आणि तो आत्ताच फ्रैंकफर्टला रवाना झाला होता.

 अचानक बेल वाजली. यावेळी कोण असेल हा विचार करतच मी दार उघडलं तर दारात मॅगी काकु(माझी जर्मन शेजारीण). आता ह्यांच काय काम असेल बुआ माझ्याकडे.. मनात विचार आला. सकाळच्या आठच्या ठोक्याला मॅगी काकु बॉलीवुड मधील अभिनेत्री सारख्या दिसत होत्या आणि मी....असो.

       मला धक्के देण्याचा चंगच बांधला होता बहुतेक काकुंनि. मी म्हटलं "कशा आहात काकु?" आणि मनात म्हणाले "सकाळी सकाळी काय काम काढलत?" तर काकु म्हणाल्या "काय सांगु बाई तुला, रात्रभर डोळयाला डोळा नाही माझा." मला वाटलं त्याना बरं नाहीये. मी काळजीच्या स्वरात विचारलं "तब्येत बरी नाही का काकु?"
काकु "अगं नाही तसं काही नाही. काल रात्री मला जरा विचित्र (विअर्ड) आवाज आले त्यामुळे झोपच नाही लागली शांत." 
मी "अगं बाई हो का? कशाचा आवाज होता हो काकु?" 
काकु "आणि तो आवाज कदाचित तुमच्याच घरातुन आला."
आता माझी टरकली(सटकली नाही). उगीच गाणं मनात आलं ना. 
मी साळसुदपणे "अच्छा असं होय."
काकु "अगं खरच आणि मला खुपच त्रास झालाय त्या आवजाचा. खरतर मी कम्पलेंटच करणार होते पण म्हटलं तुला एकदा विचारू."

    आता मात्र माझी पाचावर धारण बसली. देवाचे आभार मानले की नशीब या बाईने कम्पलेंट नाही केली आणि मनात म्हटलं "काय घोडं मारलं देव जाणे या बाईच मी मागच्या जन्मी?" बापुडवाणा चेहरा करत मी म्हणाले " कम्पलेंट न केल्याबद्दल शतश: आभार. पण नक्की कसा आवाज येत होता हो?" आता मनात चित्रविचित्र आवाजांचे विचार यायला लागले. नारायण धारपांच्या भीतिदायक कथा वाचल्याचा परिणाम. एकतर आधीच इथे स्मशान शांतता म्हणतात ना तशी शांतता असते. आजूबाजूला लोकं राहतात ह्यावर विश्वासच बसत नाही जोपर्यंत ते लोक प्रत्यक्ष तुम्हाला दिसत नाहीत. काकु विचार करत होत्या नक्की आवाज कसा ते आणि मी आपली भयकथा मधले आवाजांचे विचार करत होते. त्या विचारांसोबत बाकीही बारीकसारीक तपशील आठवायला लागले. मानेवरचे केस ताठ उभे करणारा गारवा, हाडे गोठवणारी थंडी वगैरे वगैरे.

       न रहावुन मी विचारलं "काकु सांगा ना कसा आवाज?" काकु तंद्रीतुन जाग्या होत म्हणाल्या "अगं दाराचा आवाज. तो नाही का दारात तेल न घातल्यावर येतो तसा." हे ऐकून हसावं की रडावं हेच कळेना. माझ्या घरातल्या दाराच्या आवाजाने दुसऱ्या घरातील माणसाची झोपमोड होऊ शकते हया गोष्टीवर विश्वास ठेवायला माझं भारतीय मन अजिबात तयार होइना. असा आवाज माझ्या अख्या खानदानाला कधीही दुसऱ्याच्या घरातुन आला नसता आणि झोपेत तर या जन्मी नक्कीच नाही. मी अति आत्मविश्वासाने म्हणाले " पण माझ्या घरातल्या कोणत्याच दाराचा आवाज येत नाहीये." आणि काकुंची जरा गंमत करावी म्हणून म्हणाले की "तुम्हाला वेळ लक्षात आहे का कधी आवाज आला ते?" डोक्यात दिल चाहता है चा सीन आला..सैफ त्या सुबोधला विचारतो तुम्हे टाइम याद है? तो सुबोध म्हणतो ऑफकोर्स याद है आणि सैफ छातीत चाकू मारायची एक्शन करतो. भन्नाट आहे तो सीन.

  तर काकुंच्या उत्तराने माझी अवस्था त्या सीन मधल्या सैफ सारखीच झाली. काकु म्हणाल्या "ऑफकोर्स वेळा लक्षात आहेत. मी लिहुनच ठेवल्या आहेत. रात्री 2:10 आणि पहाटे 6.25." मी कसनुसं हसले. मी विचार करायला लागले. आदल्या दिवशी दादाबरोबर आम्ही सगळे मस्त फिरलो होतो त्यात माझा दादा आलाय म्हणल्यावर आमच्या ह्यांनी त्याची खास (मुनिच मधील अमृतपान वगैरे) बडदास्त ठेवली होती. असो. त्यामुळे सगळे रात्री घोडे विकुन झोपले होतो. त्यात दादाची पहाटेची ट्रेन असल्यामुळे लवकर उठायच होतं.मग मला आठवलं की 2 च्या आसपास मीच उठले होते आणि पहाटे तर दादाची आवरायची गडबड चालू होती.

  तर मुद्दा होता की दाराचा आवाज. काकु फुल्ल कॉनफिडंट होत्या की माझाच घरातल्या दाराचाच आवाज होता तो. त्या म्हणाल्या "जरा तु तुमचे दारं चेक करते का?" मी "हो हो करते आणि तुम्हाला सांगेन हो." काकु "लगेच माझासमोर कर." मी मनात "हे भगवान बचाले." मग मी मेन डोअर चेक केलं. त्याचा आवाज नव्हता. मग बाथरूमचं डोअर. त्याचाही आवाज नव्हता. हॉल आणि मेन डोअर ला जोडणाऱ्या पॅसेजचा दरवाजा हलवला तर त्याने कुँई... केलं. आणि मनात म्हणाले "अरे लबाडा तु आहेस होय." तर काकुंच्या चेहऱ्यावर विजयी हास्य आणि त्या चित्कारल्या " हाच तो आवाज. हयानेच मला जाग आली." मी पुन्हा बापुडवाणा चेहरा केला आणि त्यांची माफी मागितली.खरच या जन्मात हा आवाज मला झोपेत आला नसता आणि या बाईला तिच्या घरात आला. तसा जागेपणीही तो आवाज आम्हाला कोणालाच आला नव्हता ती गोष्ट वेगळी.

  मी लगेच खोबरेल तेलाची बाटली घेतली आणि दाराच्या बिजागऱ्यामधे तेल ओतलं. मी जे केलं त्याचा प्रचंड धक्का काकुना बसला असावा. त्या काय अडाणी आहे ही असे भाव चेहऱ्यावर आणून अविश्वासाने म्हणाल्या " अगं हे तेल नसतं गं. स्पेशल असतं ते. तुला आणव लागेल."
"अहो तुम्ही बघाच दरवाजा अजिबात वाजणार नाही ह्या तेलाने. आम्ही भारतीय लोक बऱ्याच गोष्टिना हेच तेल वापरतो." नाही तिथे भारतीय असल्याचा अभिमान दाखवत मी म्हणाले. आणि दरवाजा हलवुन दाखवला त्याना. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघुन मी सुटकेचा निश्वास सोडला.
काकुना म्हणाले की यापुढे कोणतेही आवाज आले किंवा काहीही प्रॉब्लेम आला तर कृपया मला आधी सांगा. लगेच कम्पलेंट करु नका हो. (गरीब की दुआ मिलेगी). आणि काकु मला बाय म्हणुन त्यांच्या घरात गेल्या.
ह्या प्रसंगानंतर आम्ही तिघेही डोळयात तेल घालुन आणि कानाला खडा लावून सगळ्या आवाजांवर लक्ष ठेवत असतो. आणि काकु दिसल्या की मी तिथून पटकन पळ काढते न जाणो अजुन काहीतरी काढून माझी वाट लावायच्या.

"तरी बरं काकुना मराठी कळत नाही. नाहीतर...."

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

खरच मोठा झालास रे राजा

 सकाळी 8-8.30 ची वेळ असते. तुमचे हे ऑफिस ला आणि लेक शाळेत पोहोचलेले असतात. तुम्ही निवांत FB आणि WA वर पडीक असता.अचानक तो इमेल येतो. जे काम मिळवण्यासाठी तुम्ही जीवाच रान केलेल असत. ज्या साठी तुम्ही सलग 12 तास ऑनलाइन काम करण्याचे त्या प्रोजेक्ट मॅनेजरला कबुल केलेले असते. त्याच कामाचा ईमेल असतो आणि तुमच्या डोळ्यांसमोर लेकाचा चेहरा येतो. आता याला शाळेतुन कोण आणणार?
तुम्ही लगेच "ह्यांना" कॉल करायला फोन हातात घेता आणि त्यांचं ते वाक्य तुम्हाला आठवतं "आज मला लंच नंतर सलग 4 वजेपर्यंत मीटिंग्स् आहेत". तरीही तुम्ही ह्यांना कॉल करता.
"तु प्लीज़ आण ना रे त्याला"
"अग आज शक्यच नाहीये.मी तुला सकाळीच संगितलं होता ना. तु शाळेत फोन करुन त्याला सांग आज एकटयाला घरी यायला. मोठा झाला तो आता. चल मला खुप काम आहे मी फोन ठेवतो. तो घरी आला की कळव."
"अरे पण..."
फोन कट.
मग तुम्ही विचार करता की बघु पुढचे पुढे आणि कामाला लागता.
कामाच्या नादात 3 कधी वाजतात ते कळतही नाही.आता खरी धाकधुक सुरू होते. त्याला घ्यायला जायचं म्हणजे आत्ता घरातुन निघणे गरजेचे असते कारण 2 ट्रेन्स बदलुन जावं लागत असत शाळेत. आधी मेट्रो ने 1 स्टेशन आणि नंतर त्या स्टेशन वरुन 2 मजले खाली येऊन अंडरग्राउण्ड मेट्रो ने 2 स्टेशन्स.
आणि ह्याच गोष्टिमुळे तुम्ही त्याला एकटयाला येऊ द्यायला घाबरत असता.
पण काम सोडणही शक्य नसत. शेवटी तुम्ही मनाचा निर्धार करता की लेकाला एकट येऊ द्यायच. तरीही मन थाऱ्यावर नसतच. मग तुम्ही मैत्रिणीला फोन करता. ती रोज शाळेत येत असते मुलीला घ्यायला.
तिच्या फोनवरुन लेकाशी बोलता. त्याला सगळ्या सूचना देता."आंटी कडून पैसे घे. व्यवस्थित टिकीट काढ. ट्रेन पकडण्यासाठी पळु नको. एस्कलेटर वर(सरकता जिना) गडबड करु नको. ट्रेनचा दरवाजा लागत असेल तर थांब. वगैरे वगैरे."
"अग आई माहित आहे ग मला सगळ आणि मला तुझापेक्षा चांगल जर्मन पण येत. मी फोन ठेवतो नाहीतर माझी ट्रेन जाईल."
"नीट ये रे राजा."
आणि मग वाट पाहण्याचा अजब खेळ सुरु होतो. तुमच लक्ष ना धड कामात असत ना धड कशात. जीव टांगणीला लागलेला असतो. आणि बरोबर अश्या वेळेसच घड्याळ इतक हळु चालत असत की बास.
आत्ता 4 वाजलेले असतात. तुम्ही लॅपटॉप घेऊन सरळ बाल्कनी मधे बसता की लेक आला की लगेच दिसेल.
आणि तुमच्या लक्षात येत की ढग जमलेले आहेत, वारा जोरात वाहतोय, वादळाची चिन्ह दिसत आहेत. अरे आज आपण हवामानाचा अंदाजच बघितलाच नाहीये (इथे अंदाज 95% बरोबर असतात). पिल्लूला छत्री पण दिलेली नाहीये.
आत्ता 4 वाजुन 10 मिनिटे झालेली असतात. एव्हाना लेक घराजवळच्या स्टेशन वर पोहोचला असेल. डोक्यात नुसते विचार चालु असतात. ट्रेन्स वेळेवर असतील ना? त्याला मिळाली असेल ना? नकोच होत मी त्याला एकटयाला येऊ द्यायला... म्हणतात ना मन चिंती ते वैरी ना चिंती. असो.
तुम्ही तडक पायात चपला सरकवता आणि घराच्या बाहेर पडता. वादळाचा जोर एव्हाना वाढलेला असतो. तुम्ही गेटच्या बाहेर पडुन स्टेशन कडे जायला वळता. मनात विचारांचे काहुर माजलेले असते.
आणि स्टेशन जवळ आल्यावर समोर तुम्हाला तुमच लेकरु दिसत आणि तो तुम्हाला बघुन पटकन बिलगतो आणि म्हणतो "अग आई मी मोठा झालोय ग. I am 9 years old, I can manage. पण तु हे असे कपड़े का घालुन आलीस? " आणि टांगणीला लागलेला तुमचा जीव भांड्यात पडतो.
ह्या आनंदाला तोड नाही जगात. हो ना?


ता.क. : हे असे कपड़े म्हणजे पंजाबी सुट... जस काही मी मुनिच मधे नउवारीच घालुन फिरते रोज. मनात म्हटले खरच मोठा झालास रे राजा.

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

वह्या पुस्तकांपेक्षा खेटरं जड....

हुश्श .. संपत आल्या एकदाच्या लेकाच्या उन्हाळ्याच्या सुट्या. आज त्याच्या शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी केली तर...
एक वर्गात घालायचा...
एक इनडोअर स्पोर्ट्स साठी...
एक आऊटडोअर स्पोर्ट्स साठी... 
एक पावसात घालायचा...
एक बर्फात घालायचा...
आणि एक रोज घरून शाळेत जाताना वापरायचा...
असे फक्त खेटरं म्हणजेच शूज घ्यायचे आहेत आणि शाळा सुरु व्हायच्या दिवशी तिथे नेऊन पटकायचे म्हणे आणि मुलांनी हवामानाप्रमाणे शूज घालायचे. आणि तीच गत जॅकेट्सची सुद्धा.
आपण जेव्हा ही यादी करतो तेव्हा जाणीव होते की शाळेत असताना फक्त शाळेचे बूट आणि एक स्लीपर याव्यतिरिक्त कोणत्याही वेगळ्या चपला अस्तित्वात असतात हे आपल्या गावीही नव्हते.
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #munichdiaries

अनुभवाचे Stock market

तुम्ही 4-5 वर्षांपूर्वी(pre मोदी era) एक fundamentally अत्यंत strong असलेला stock शेअर मार्केट मधे खरेदी करता कारण नुकतच तुम्ही त्याचा बेसिक course वगैरे केलेला असतो....
technical analysis ची काडीचीही(इथे तुम्हाला वाटेल तो शब्द वापरावा) माहिती नसतना तुम्ही तो stock बऱ्यापैकी higher range ला विकत घेता....
त्यानंतर तो stock वाईट पडतो तरीही तुम्ही hold करता... का तर म्हणे conviction(असे शब्द शेअर मार्केट मधे वापरावे लागतात).
आणि दरम्यान च्या काळात मोदी सरकार आलेल असतं... शेअर मार्केट new high वगैरे करत असतं... बरेचसे stocks 1000% वगैरे वाढलेले असतात, बरेच लखपती लोक करोड़पती झाले आहेत असं तुम्ही news मधे वाचत न ऐकत असता आणि स्वप्न पहात असता की.... असो.
एवढा सगळं होऊनही "तो" stock तुम्ही घेतलेल्या किमतीच्या साधा 50 पैसेहि वर गेलेला नसतो....तुम्ही follow करत असलेला मार्केट analyst जीव तोडून सांगत असतो की don't marry a stock, keep booking profits वगैरे ... तरीही तुम्ही "तो" stock होल्ड करता....
आणि एक दिवस तुमच्या सहनशक्तीचा अंत होतो...तुम्ही तो जीवापाड जपलेला stock घेतलेल्या कीमतीलाच विकुन टाकता....🙄
आणि हाय रे कर्मा... एका अत्यंत जवळच्या व्यक्तिने दिलेल्या शापाला जागत "तो" stock तुम्ही विकल्या नंतर अर्ध्या तासात 15 रुपयांनी वाढतो...ही जी काय तुमची परिस्थिती असते ना ती म्हणजे @$#@#.... असो.
आणि अशा रीतीने FB आणि WA वर काहीबाही status टाकुन तुम्ही तुमच्या दुःखाला वाट मोकळी करून देता...
ता.क. : अत्यंत जवळच्या व्यक्तीचा शाप - "तु हा stock विकलास की कसा पळेल बघ." 👻



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #stockmarketdiaries

वाचकांना आवडलेले काही