शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

मोबाइलपुराण

    
 आजचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरु होतो. ठरलेल्या रुटीन प्रमाणे ती तिचं आवरुन शाळेत पोहोचते. शाळा नुकतीच सुरु झालेली असते त्यामुळे तिच्यावर कामाचा जरा जास्त ताण असतो.
नवीन सुरु झालेल्या शाळेचं एडमिन सांभाळणे म्हणजे काही चेष्टा नाहीये. नवीन ऍडमिशन्स, नवीन शिक्षक, वर्षाचे टाईमटेबल वगैरे वगैरे. एक नाही दहा. एकमागुन एक काम ती हातावेगळी करते.
एव्हाना शाळेची वेळ संपत आलेली असते. तितक्यात हाताखालच्या मावशीनी तिला सांगितले की तिला बाहेर बोलवलं आहे.
बाहेर मुलांना घरी सोडणारी ओमनी वॅन उभी असते. एका नवीन मुलाचे नाव त्या वॅन च्या लिस्ट मधे नसल्यामुळे चालक तिची वाट पाहत असतो.ती गडबडीत ओमनीच्या खिडकीच्या काचेवरच कागद ठेवुन त्या मुलाचं नाव लिस्ट मधे टाकते आणि ओमनी तिच्या प्रवासला निघते.

     ती पुन्हा ऑफिस मधे येऊन तिच्या कामाला लागते. आणि तिला आठवतं की तिला एका पब्लिशर ला फोन करायचा आहे. म्हणुन ती तिचा मोबाइल शोधयला लागते. जो तिला तिच्या आत्ताच झालेल्या वाढदिवसाला तिच्या ह्यांनी भेट दिलेला असतो.
पर्स शोधुन होते, टेबल बघितला जातो, शाळेतील सगळ्या सहकाऱ्याना विचारून झालेले असते पण फोन कुठेही सापडत नाही. आता तिला हेही आठवत नसतं की शेवटी आपण फोन ठेवला कुठे?

      तिला तिच्या ह्यांना कॉल करायचा असतो तर तिच्या लक्षात येतं की फक्त एक नंबर सोडुन कोणताही नंबर तिला पाठ नाहीये आणि तो फोन नंबर हयांचा नसुन लहाणपणी घोकलेला माहेरच्या घरचा आहे. म्हणजेच औरंगाबादचा आहे. "काय चाललय यार..डोक्याचा भुगा झालाय विचार करून पण ह्यांचा नंबर आठवत नाहीये. त्याला कळलं तर.." नकोच तो विचार. आणि प्रचंड तणावात एका कलिगच्या फोनवरुन घरी कॉल लावते.
वडील फोन उचलतात. ती " बाबा मला जरा ह्यांचा नंबर देता का? माझा फोन हरवला आहे."
बाबा तिच्यावर प्रश्नंचा भडीमार करतात. "असा कसा हरवला फोन? तुला साधा नवऱ्याचा नंबर पाठ नाही? कसं होणार तुम्हा मुलींचं." ती सगळ गपगुमान ऐकून घेते. ते नंबर देतात.
एव्हाना शाळेतील सहकारी आणि तिचे आई वडील तिच्या फोनवर सतत कॉल करत असतात. पण नुसती रिंग वाजत असते.
आता तिला खूप टेंशन येतं. "एवढा महागाचा मोबाइल. गेला आता. 15 दिवसांपूर्वीच सिनेमाला गेलो होतो तेव्हा थिएटर मधे विसरला होता.. बरं झालं ह्याने पटकन जाऊन शोधला तर सापडला. आज जर नाही सापडला तर काही धडगत नाही माझी. इतकी कशी वेंधळयासारखी वागते मी!" असो.

ती जरा घाबरतच ह्यांना कॉल करते "अरे माझा फोन सापडत नाहीये." समोरून 1 मिनिट काहीच रिप्लाय येत नाही. ती "मला काहीच सुचत नाहीये. प्लीज सांग ना मी काय करु? " आवाज शक्य तितका शांत ठेवत तो "पोलिस कंप्लेन्ट करावी लागेल आणि तुझे दोन्ही नंबर्स ब्लॉक करावे लागतील. असं कसं करतेस तु? मागच्या महिन्यातच घेतला आहे ना फोन."
तिला माहित असतं ही वादळापुर्विची शांतता आहे. ती ओके म्हणुन फोन ठेवते आणि पोलिस स्टेशनला जाण्यासाठी निघणार तोच एका कलिग चा आवाज येतो "अहो मॅडम तुमचा फोन सापडला!" तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही. "अहो तुमचा फोन वॅनच्या ड्रायव्हर कडे आहे." तिचा जिवात जीव येतो.
आणि तिच्या लक्षात येतं की त्या मुलाचं नाव लिहिताना तिने फोन ओमनी च्या टपावर ठेवलेला असतो आणि ते ती पार विसरून गेलेली असते. एव्हाना औरंगाबादला पण कळालेलं असतं की फोन सापडला आहे कारण तेही तिच्या फोनवर सतत कॉल करत असतात.

तर असा हा चमत्कारी फोन बाणेर-बालेवाडी-पिम्पळे निलख-औन्ध-बाणेर (पुणे शहरातील एरिया)असा प्रवास ओमनीच्या टपावरच करतो. एवढे सगळे खड्डे, स्पीड ब्रेकर्स, आणि कोणत्याही सिग्नलला कोणाच्याही नजरेला न पडता शांतपणे टपावर बसुन असतो. जेव्हा कोणीतरी ड्रायव्हरला फोन करून सांगतं की मोबाईल ओमनी मधे आहे का बघ तेव्हा हा चमत्कारी फोन त्याला निवांतपणे टपावर पहुडलेला दिसतो.
अशा रीतीने "देव तारी त्याचा नविन मोबाईल कोणी न चोरी किंवा कुठेही ना हारवे" ह्या नविन म्हणीचा प्रत्यय तिला येतो.
त्या दिवसा नंतर हा चमत्कारी मोबाईल कोणाच्याही दृष्टिसही पडलेला नाहीये कारण तो आता तिच्या खास मोबाईल साठी घेतलेल्या पर्समधे विराजमान असतो आणि फक्त कामापुरताच बाहेर येतो.

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #punediaries

२ टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही