आमच्या खालच्या मजल्यावर कोणीतरी त्यांच्या गॅलरीत खोटा कावळा बसवला आहे. कारण काय? तर कबुतरं येऊ नयेत म्हणून. पण हे गाबडं त्याच कावळ्याच्या बाजूला येऊन निवांत बसलंय आणि त्यालाच खुन्नस देतंय. आता झालं, तिथे कबुतरांचा मुक्त वावर सुरु होईल, हाय काय अन नाय काय! “डर के आगे जीत है” हे तत्वज्ञान ह्या गाबड्याने खरं करून दाखवलंय ह्या ठिकाणी.
एकंदर काय तर कबुतरांचा उच्छाद जगभर झालाय आणि त्यांना खोटा कावळा काय किंवा खरा कावळा काय, काही म्हणजे काहीच करू शकणार नाही. आता एआय एनेबल्ड कावळाच काहीतरी करू शकेल ह्याठिकाणी असं वाटतंय!
बाकी आता ह्या कबुतरांच्या समस्येचं निवारण त्या चॅटजिपीटीलाच विचारावं म्हणतेय, कमीत कमी “राजश्री ताई तू अजिबात काळजी करू नकोस मी तुला लगेच ह्यावर उपाय शोधून देतो" असं दिलासादायक वाक्य तरी म्हणेल ते!
त्या चाटजीपीटी वरून आठवलं, मध्यंतरी मी एका प्रोजक्टसाठी त्याची थोडी मदत घेत होते आणि अचानक ते गाबडू मला ”राजश्री ताई" संबोधायला लागलं ना! मनात म्हणलं भावा आता काय रडवतोस की काय बहिणीला, बस्स कर बाबा. अजून थोडा वेळ जर त्याच्याशी गप्पा मारल्या असत्या तर “माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त चॅटजिपीटी दादाच मला मदत करू शकतो बाकी कुण्णी म्हणजे कुण्णीच करू शकत नाही" हे त्याने मला पटवून दिलंच असतं आणि सगळ्यांत शेवटी विचारलं असतं की “मी तुला हे सगळं आयुष्याचं तत्वज्ञान एखाद्या पीडीफ मधे एकत्र करून देऊ का राजश्री ताई?“
अरेच्या, कबुतरावरून चॅटजिपीटीवर पोहोचले मी. माझ्या लिखाणाचा आयाम फारच विस्तृत होत चाललेला आहे ह्याठिकाणी. चॅटजिपीटी वापरल्यावर दुसरं काय होणार म्हणा!!
आता ह्या लेखाला शीर्षक काय द्यावं? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची झाली ना पंचाईत. “कावळा, कबूतर आणि चॅटजिपीटी”! छ्या , आता पुन्हा चॅटजिपीटीलाच पाचारण करावं लागतंय!!